
<rss version="2.0">
<channel>

<title><![CDATA[आनंदघन]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7</link>
<description><![CDATA[मनात आलं तसं लिहीत गेलो आहे. गोड मानून घ्यावे.]]></description>
<language>en-us</language>
<lastBuildDate>Wed, 20 Aug 2008 16:49:25 GMT</lastBuildDate>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ८७ चीन, चिनी आणि चायनीज - ४]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1491</link>
<description><![CDATA[<p><br />चिनी लोक पूर्वीपासूनच कष्टाळू आणि उद्योगी समजले जात आहेत. चित्रविचित्र आकृत्यांनी सजवलेले चिनी मातीचे मोठाले रांजण आणि तबकड्या जगातल्या बहुतेक पुराणवस्तूसंग्रहालयात आढळतात. रेशीम हा तर तेथला प्रसिध्द उद्योग होता. रेशमाची निर्यात ज्या मार्गाने चीनबाहेर होत असे ते रस्ते 'सिल्क रूट' याच नांवाने ओळखले जात. कागद तयार करण्याची प्रक्रिया प्रथम चीनमध्ये विकसित झाली आणि नंतर जगभर पसरली. व्यास, वाल्मिकी किंवा सॉक्रेटिस, प्लूटो यांच्या बरोबरीने कॉन्फ्यूशिअस या चिनी तत्ववेत्त्याचे नांव आदराने घेतले जाते. ह्यूएनत्संग या इतिहासकालीन चिनी पर्यटकाने केलेल्या नोंदी प्रसिध्द आहेत. प्राचीन काळात चीन हा देश समृध्द मानला जात होता. मध्ययुगात तो थोडा वेगळा पडला होता आणि कम्युनिस्ट क्रांतीनंतर त्याने सोव्हिएट युनियन सोडून अन्य जगाशी फारसे संबंधच ठेवले नव्हते. त्यामुळे त्याने स्वतःभोवती घातलेल्या बांबूच्या पडद्याआड काय चालले आहे ते गुलदस्त्यात राहिले होते.</p> <p>चिनी वंशाचे लोक पूर्वीपासूनच इतरत्र पसरले आहेत. पूर्व आशिया खंडातल्या सगळ्याच देशात ते मोठ्या संख्येने राहतात. सिंगापूरमध्ये ते बहुसंख्येने आहेत. चिनी वंशाच्या लोकांनी आपल्या पाककौशल्याचा जगभर प्रसार केला आणि सर्व प्रमुख शहरात चिनी जेवण मिळते हे मागील भागात पाहिलेच. त्यामुळे चिनी माणूस म्हंटला की तो खानसामा किंवा बावर्ची असेल असे कांही लोकांना वाटणे शक्य आहे. इतर कांही उद्योगातसुध्दा त्यांनी आपला जम बसवलेला आहे. कोलकात्याच्या बाजारात मिळणा-या वेताच्या आणि चामड्याच्या वस्तू बहुधा चायनाटाउनमधल्या असतात. कां ते कोणास ठाऊक, पण अनेक जागी चिनी दंतवैद्य असतात. इतर कांही दुखण्यांवरसुध्दा एकादे खास चिनी औषध अकशीर इलाज समजले जाते. त्यात वाघ, सिंह, गेंडा, हत्ती यासारख्या वन्य प्राण्यांचे रक्त, मांस, हाडे, चामडी वगैरेचा अंश असल्यामुळे ती प्रभावी ठरतात असा समज पसरवला गेला आहे. आजकाल कोणीही हौस म्हणून यातल्या कोणत्याही प्राण्याचे मुंडके आपल्या दिवाणखान्यात लावून ठेऊ शकत नाही तरीही या वन्य पशूंच्या देहाला चिनी औषधी बनवण्यासाठी मोठी किंमत मिळते या कारणामुळे जगभरातल्या अरण्यांत या बिचा-या वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी चिनी लोकांच्या मार्शल आर्ट्समधील मारामारीतल्या चमत्कारावर आधारलेल्या इंग्रजी चित्रपटांची एक लाट आली होती. त्यानंतर जुडो, कराटे, कुंगफू, ताकिआंदो वगैरे चिनी, जपानी व कोरियन प्रकार बरेच प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात आले होते. </p> <p>आजच्या चीनमधल्या लोकांनी मात्र असल्या परंपरागत क्षेत्रावर विसंबून न राहता आधुनिक यंत्रयुगातली नवनवीव क्षेत्रे पादाक्रांत करण्याचा चंग बांधला आहे असे दिसते. इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या सुमारास भारतातही फारशी यंत्रसामुग्री तयार होत नव्हती आणि चीनमध्येही होत नव्हती. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्विट्झरलंड यासारख्या प्रगत देशांतून आयात केलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या यंत्रसामुग्रीवर भारताचे औद्योगीकरण सुरू झाले. चीनला सर्व यंत्रे कम्युनिस्ट देशांकडून जशी मिळतील तशी घ्यावी लागली. पुढे कांही भारतीय उद्योगसमूबांनी कांही यंत्रे परदेशी कंपन्यांच्या सहाय्याने इथेच बनवायला सुरुवात केली तर चीनने स्वतः त्यातले तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आणि त्यात ते अधिकाधिक प्राविण्य संपादित करत गेले. लघुउद्योगाला प्रोत्साहन आणि मोठ्या कारखान्यांवर अंकुश ठेवण्याच्या आपल्या धोरणामुळे या क्षेत्रात होणा-या प्रगतीवर विपरीत परिणाम झाला. कालांतराने लुधियाना, बटाला, राजकोट यासारख्या गांवातल्या लहान कारखान्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची साधीसुधी यंत्रे मोठ्या प्रमाणावर बनून भारतात आणि मागासलेल्या देशात ती खपू लागली. मात्र मोठ्या कारखान्यांची व्हावी तेवढी वाढ झाली नाही. आता युरोप अमेरिकेत कष्ट करू इच्छिणारा मजूरवर्ग जवळजवळ नाहीसा झाल्यामुळे तिकडचा यंत्रोद्योग उतरंडीला लागला आहे. पण भारतीय उद्योग त्याची जागा घेऊ शकला नाही. ते काम चीनने यशस्वी रीत्या केले आहे. त्यामुळे पहिल्या पिढीतली जी परदेशी यंत्रे जुनी झाली त्यांच्या जागी कांही काळ भारतीय बनावटीची यंत्रे येत होती, पण आता अधिकाधिक जागी चिनी बनावटीची नवी यंत्रे दिसू लागली आहेत. अशा प्रकारची यंत्रे इथेसुध्दा तयार होऊ शकतात, पण चिनी यंत्रे जास्त आधुनिक असूनही स्वस्तात मिळतात. त्यामुळे ती घेतली जातात.</p> <p>मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतीकीकरणाचा जास्तीत जास्त लाभ पूर्व आशियातील देशांनी करून घेतला आहे. या नव्या धोरणाचे वारे वहायला लागताच सोनी, नॅशनल पॅनासॉनिक, होंडा, सुझुकी आदि जपानी कंपन्या आणि एलजी, सॅमसुंग, ह्युएंदाई सारख्या कोरियन कंपन्यांनी मोटारी, टीव्ही, रेफ्रिजरेटर वगैरेचे वाढते मार्केट काबीज केले. यासारखी कोणतीही मोठी चिनी कंपनी दिसत नाही पण या जपानी व कोरियन यंत्रांचे अनेक भाग चीनमध्ये बनतात असे समजते. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात लागणा-या अगणित वस्तू तर अमाप संख्येने चीनमध्ये तयार होतात आणि भारतातल्या शहरातल्याच नव्हे तर खेड्यापाड्यातल्या बाजारातसुध्दा त्यांचा महापूर येऊ लागला आहे. दिवे मिचकावणारी आणि वेगवेगळे आवाज काढणारी अतिशय आकर्षक अशी स्वयंचलित चिनी खेळणी अगदी स्वस्तात मिळतात. डासांना मारण्याची चिनी रॅकेट घराघरात पोचली आहे. महागातले टॉर्च आणि बॅटरी सेल्स यासारख्या वस्तूंच्या चिनी डुप्लिकेट अर्ध्यापेक्षा कसी भावात मिळतात. कुठलेच ब्रँडनेम नसलेल्या या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कशा इकडे येतात, खेड्यात भरणा-या आठवड्याच्या बाजारापर्यंत त्यांचे वितरण कोण करतो आणि या साखळीतल्या सर्वांचे कमिशन कापल्यावर मूळ चिनी उत्पादकाला त्यातून किती किंमत मिळते आणि ती त्याला कशी परवडते या सगळ्याच गोष्टींचे मला गूढ वाटते. एका बाजूने ग्राहकाला त्याचा फायदा होत असला तरी त्या वस्तूंचे उत्पादन करणारा भारतीय उद्योग संकटात सापडला आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञांनी बरीच आघाडी मारल्याचे आज दिसत असले तरी चीन हा या क्षेत्रातला जबरदस्त प्रतिस्पर्धी होऊ पहात आहे. लार्सन अँड टूब्रो, विप्रो, इन्फोसिस यासारख्या भारतीय कंपन्यांनी आता चीनमध्ये शाखा उघडल्या आहेत आणि आपले कांही काम ते आता तिकडे वळवीत आहेत.</p> <p>उद्योगाच्या क्षेत्रातच नव्हे तर शिक्षणाच्या क्षेत्रातसुध्दा चीनने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतातल्या मेडिकल कॉलेजमधल्या अव्वाच्या सव्वा झालेल्या कॅपिटेशन फी पेक्षा चीनमध्ये कमी खर्च येतो या कारणाने कांही भारतीय विद्यार्थी आता चीनमध्ये शिक्षणासाठी जाऊ लागले आहेत असे ऐकले. भाषेचा आणि जेवणाचा प्रॉब्लेम असूनसुध्दा चीनमध्ये शिक्षण घेणे ते पसंत करतात. व्यापारी वर्गाला अजून चीनबद्दल पूर्ण विश्वास वाटत नाही, पण तरीही जगभरातील मोठ्या कंपन्यांनी आपली जाळी चीनमध्ये पसरवायला सुरुवात तर केली आहे. रस्तेबांधणी, नगररचना आदि बाबतीत चीनने आश्चर्यजनक प्रगती केली आहे. आता तिथली प्रमुख शहरे युरोपमधील शहरासारखी दिसू लागली आहेत. त्यामुळेच आता मुंबईचे शांघाय करण्याच्या गोष्टी बोलल्या जात आहेत.</p> <p>क्रीडाक्षेत्रात चीनने केलेल्या प्रगतीने सर्व जग अचंभित झाले आहे. अगदी शून्यापासून सुरुवात करून आज चीन हा देश पहिल्या क्रमांकावर जाऊन पोचला आहे. बीजिंग येथे सध्या चाललेल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत एकाग्रता, चापल्य किंवा शरीरसौष्ठव लागणा-या एकूण एक क्रीडाप्रकारात स्त्रिया किंवा पुरुष, वैयक्तिक किंवा सांघिक अशा सर्व गटात चीनचे स्पर्धक एकामागोमाग एक विजय मिळवत आहेत असे रोजच्या रोज पहायला मिळते. हे यश खेळाडूंवर जोर जबरदस्ती करून किंवा बंदुकीच्या धांकाने मिळत नसते. त्यासाठी काय करायला हवे त्याचा सखोल विचार करून त्याला पोषक असे वातावरण तयार करावे लागते, खेळाडूंना अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रवृत्त करावे लागते, तसेच त्यासाठी लागणारी उत्कृष्ट दर्जाची साधनसामुग्री द्यावी लागते. आजच्या युगात खेळातील कौशल्यातदेखील तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होतो. चीनने केलेल्या सर्वांगीण प्रगतीमुळे सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे वापरून खेळाचा दर्जा वाढवण्यात चीनने एवढे यश मिळवले आहे.</p> <p>ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचा उद्घाटन समारंभ टीव्हीवर पाहतांनाच डोळ्याचे पारणे फेडणारा वाटत होता, प्रत्यक्षात तो केवढा भव्य वाटला असेल याची कल्पना करवत नाही. हजारोंच्या संख्येने त्यात भाग घेणारी लहान मुले आणि नवयुवक यांनी सादर केलेले कार्यक्रम फारच सुनियोजित होते. त्यातली कल्पकता, कौशल्य तसेच शिस्तबध्दता वाखाणण्याजोगी होती. दिव्यांची रोषणाई आणि आतिशबाजी अप्रतिम अशी होती. अवाढव्य आकाराचे कागद जमीनीवर अंथरून सर्व खेळाडूंच्या पायाचे ठसे त्यावर घेण्याची कल्पना अफलातून होती. हा एवढा मोठा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे बसवून कुठेही कसलेही गालबोट न लागता सादर करण्यामागे प्रचंड नियोजन केले गेले असेल आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस त्यात लागला असेल यात शंका नाही. यापूर्वी कधीही झाला नव्हता एवढा भव्य सोहळा घडवून आणून चीनच्या लोकांनी "हम भी किसीसे कम नही" असेच जगाला दाखवून दिले आहे.</p> <p>. . . . .. .. . . . . . . . (समाप्त)</p>]]></description>
<pubDate>Wed, 20 Aug 2008 16:49:25 GMT</pubDate>
</item>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ८६  चीन, चिनी आणि चायनीज - ३]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1486</link>
<description><![CDATA[<p>चीनने केलेल्या आक्रममानंतर दहा वर्षात पाकिस्तानबरोबर दोन मोठ्या लढाया झाल्या आणि १९७१ साली झालेले युध्द भारतीय सेनेने निर्विवादपणे जिंकले. विजयाच्या या उन्मादात १९६२ सालची कटु 'हकीकत' मागे पडली आणि 'चिनी' या शब्दाबद्दल वाटणारी घृणा कमी झाली. 'चायनीज' या शब्दाला मात्र या भावनेचा स्पर्श बहुधा कधी झालाच नाही. चायनीज म्हणताच माओचा कम्युनिस्ट देश डोळ्यापुढे न येता जगभर पसरलेल्या चिनी वंशाच्या माणसांनी लोकप्रिय केलेली खाद्यसंस्कृती हीच पटकन आठवते. 'चायनीज' शब्दाच्या जोडीला 'फूड' हा शब्द कायमचा जोडलेला असावा. </p> <p>मी मुंबईला येण्यापूर्वीपासून फोर्ट विभागात कांही चायनीज रेस्टॉरेंट्स होती. आमच्या ऑफीसच्या गेटामधून बाहेर पडताच कांही पावले अंतरावर 'मँडारिन' की 'नानकिंग' अशा नांवाची दोन तीन खाद्यगृहे होती. चारी दिशांनी बांक दिलेल्या इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या त्यांच्या ठळक, थोड्या भडकच, पाट्या मोठ्या आकर्षक होत्या. दरवाजातून दिसणारे इंटिरियर, आंतले फर्निचर आणि वेटर्सचे कपडे लक्ष वेधून घेत. पण लहानपणापासून चिनी लोकांच्या खाण्याबद्दल जे कांही ऐकले होते त्यावरून इथे कदाचित विंचवाच्या नांगीची चटणी, झुरळांची कोशिंबीर आणि सापाचे काप असले पदार्थ 'लिंगचांगफू' किंवा 'हानछाऊशुई' असल्या अजब नांवाने मिळत असतील असे वाटे. त्यामुळे हॉटेलच्या समोरून जातांना ते कितीही खुणावत असले तरी आंत पाय ठेवण्याची इच्छा होत नसे. ताज आणि ओबेरॉयसारख्या मोठ्या हॉटेलांमध्ये सेमिनार, कॉन्फरन्स वगैरेंच्या निमित्याने कधी तरी जाणे होत असे. एकदा चंव तरी घेऊन पहावी म्हणून तिथल्या खाद्यंतीतले चायनीज पदार्थ चाखून पाहिले आणि ते इतके आवडले की पोटभर खाऊन घेतले. त्यांची आवड दिवसेदिवस वाढतच गेली आणि अजून ती टिकून आहे.</p> <p>धीर चेपल्यानंतर मित्रांच्यासोबत चायनीज हॉटेलांना भेट द्यायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे त्या ठिकाणांचे मेनूकार्ड पूर्णपणे इंग्रजीतच असायचे आणि त्यात आक्षेपार्ह वाटणारा कोणताच जिन्नस दिसत नव्हता. ती हॉटेले जरी चिनी लोकांनी चालवली असली तरी तिथे येणारे सगळे ग्राहक हिंदुस्थानीच होते, त्यामुळे इथले लोक जे खाऊ शकतील असेच पदार्थ तिथे ठेवले जाणार हे उघड होते. यापूर्वी मी शेकडो मक्याची कणसे भाजून आणि तूपमीठ लावून खाल्ली होती, त्यांच्या किसाच्या गोळ्यांचे तळलेले वडे किंवा तो फोडणीला घालून तयार केलेले उपम्यासारखे पदार्थ खाल्ले होते, पण मक्याचे लुसलुशीत कोवळे दाणे वाफवून किती चविष्ट लागतात हे मला माहीत नव्हते. घरात टोमॅटोचे सार कधी केले गेले तर आम्ही जेवणाबरोबरच त्याचे भुरके मारीत असू, पुरणाच्या पोळीच्या सोबतीने कटाची आमटी व्हायचीच आणि आजारी पडल्यावर भाताची पेज प्यायला देत. या सगळ्या पेय पदार्थांना इंग्रजीत 'सूप' म्हणतात आणि पाश्चात्य लोक ते जेवणापूर्वी पितात हे मात्र तेंव्हा माहीत नव्हते. मुंबईला आल्यावर एक दोन वेळा उडप्याकडचे सूप पिऊन पाहिले, पण ते एकादी चटणी किंवा सॉस गरम पाण्यात मिसळून ढवळून दिल्यासारखे लागले, त्यामुळे फारसे पसंत पडले नाही. पण चायनीज पध्दतीचे स्वीट कॉर्न सूप पिऊन मात्र तिथल्या तिथे 'कलिजा खलास झाला'. पुढे मी अनंत प्रकारची 'क्लीअर' आणि 'थिक' सूप्स चाखून पाहिली, त्यात 'लेंटिल', ' तिरंगा', 'लंगफंग', 'क्रॅब' वगैरे प्रकारही आले. पण माझ्या मते तरी 'स्वीट चिकन कॉर्न सूप' हाच सर्व 'सूप' प्रजातींचा निर्विवाद बादशहा आहे.</p> <p>मसालेभात, बिर्याणी, पुलाव, खिचडी आदि प्रकारात मोडणारा चायनीज फ्राईड राइस दिसायलाही वेगळा असतो आणि चवीलाही. आपला मसालेभात साहजीकच मसालेदार असणार, हैदराबादी बिर्याणीही चांगली झणझणीत असते, पुलाव थोडा सौम्य असतो आणि मुगाची खिचडी तर 'आजारी स्पेशल' समजली जाते. चांगली शिजलेली पण सुटी सुटी शिते असलेला चायनीज फ्राईड राईस मुळातच चविष्ट पण बेताचा तिखट असतो आणि त्यात आपल्याला हव्या त्या चटण्या व सॉस मिसळून त्याचे पाहिजे तसे संस्करण करता येते. शिवाय त्यासोबत मांचूरियाची ग्रेव्ही असली म्हणजे आहाहा ! ! ! क्या बात है? नूडल्सची गुंतागुंतीची भेंडोळी सोडवावीत का कापावीत या संभ्रमात पडून ती खातांना आधी आधी थोडी पंचाईत होत असे. त्याचे तंत्र जमायला लागल्यानंतर ती आवडायला लागली. </p> <p>या सगळ्या चायनीज पदार्थात भोपळा मिरची, पातीचे कांदे, फरसबी, गाजर वगैरे एरवी वेगवेगळे खाण्यात येणारे पदार्थ एकत्र असतात आणि त्यातून निराळीच चंव निर्माण होते. कांही पदार्थात बांबूचे कोंब, बेबी कॉर्न, लसणीची हिरवी पाती यासारखे नवखे पदार्थही असतात. मुख्य म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचे झाले तर "सर्वात मका" असतो. तो कधी दाण्यांच्या रूपात असेल तर कधी त्याचे मैद्यासारखे गुळगुळीत पीठ ग्रेव्हीला लावलेले असेल किंवा त्या पिठात बुडवून तळलेले गोळे असतील. जोडीला सोया सॉससारख्या वेगळ्या चवी असतात. तेलाचा वापर माफक प्रमाणात केलेला असतो. कदाचित आले आणि लसूण या पाचक गोष्टी त्यात सढळ हाताने मिसळलेल्या असल्यामुळे ते पदार्थ पचायला हलके पडत असतीलही. निदान अशी समजूत तरी असते. या सगळ्या गुणांमुळे चायनीज खाणे जगभर सगळीकडे दिवसेदिवस लोकप्रिय होत गेले. मुंबईतल्या फोर्टमधल्या खास हॉटेलांतून लवकरच ते उपनगरांमधल्या सर्वसामान्य उपाहारगृहांमध्ये आले आणि आता तर रस्त्यांच्या कडेला असलेल्या वडापावाच्या स्टॉल्समध्ये व हांतगाड्यांवर चायनीज खाद्यपदार्थ मिळू लागले आहेत. अगदी लहान गांवातल्या पत्र्याच्या शेडमधल्या हॉटेलातल्या मेनूकार्डावर चायनीज विभाग असलेले मी पाहिले आहे. 'मॅगी टू मिनिट नूडल्सने' त्यांना घराघरात पोचवले आणि आता जागोजागी चायनीज पदार्थ करायला शिकवणारे क्लासेसही दिसतात. सगळेच खाद्यजग असे 'चायनीजमय' झाले असल्यामुळे निष्णात किंवा शिष्ट खवय्ये लोक आता 'थाई' आणि 'मेक्सिकन' 'क्युझिन'चे कौतुक करू लागले आहेत.</p> <p>पण आपल्या भारतीय हॉटेलात मिळणा-या चायनीज पदार्थांचे बरेचसे भारतीयीकरण झालेले असते. त्यातल्या जिरे, मिरे, लवंग, वेलदोडे, कोथिंबीर, पुदिना वगैरे मसाल्यांचा चंवी ओळखून येतात आणि लोकांना त्या आवडतात. चीनला जाण्याची संधी कांही मला मिळाली नाही, पण पश्चिमेकडे मात्र बहुतेक ठिकाणच्या चायनीज हॉटेलांत चिनी वंशाचे वाटणारे नकटे चपटे लोकच काम करतांना दिसतात. आता सगळीकडे 'इंडियन फूड' सुध्दा मिळते, पण त्याच्या खानावळी एकाद्या गल्लीबोळात आडबाजूला असतात. चायनीज रेस्तराँ मात्र शहरांच्या मध्यवर्ती भागांत मोक्याच्या नाक्यांवर झोकाने विराजमान दिसतात. तिथे मिळणा-या अन्नाची चंव वेगळीच असते. आपण जन्मात कधी न पाहिलेली पाने, फुले आणि बिया व त्यांचे अर्क त्यात घातलेले असतात. त्यातल्या भाज्या आणि मांसाचे तुकडे व्हिनेगारसारख्या द्रवात भिजवून ठेवत असतील. एकादा पदार्थ खाल्ल्यानंतर नक्की त्यात काय होते ते ओळखण्याएवढा मी त्यातला तज्ञ नाही, पण पूर्वी खाल्लेल्या पदार्थापेक्षा त्यात कांही तरी वेगळे असे आहे इतपत समजून येते. या आगळ्या चंवी कधी खूप आवडतात तर कधी नाही. पण मिळमिळीत कॉंटिनेंटल पदार्थांपेक्षा त्या नक्कीच उजव्या असतात. </p> <p>. . .. . . . . . . . . . (क्रमशः)</p> <p></p>]]></description>
<pubDate>Mon, 18 Aug 2008 16:30:29 GMT</pubDate>
</item>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ८५  चीन, चिनी आणि चायनीज - २]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1483</link>
<description><![CDATA[<p>भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताची अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदी लाभली आहे. आजवरच्या इतिहासात कोठलाही शत्रू तिला पार करून भारतापर्यंत येऊन पोचू शकला नव्हता. जी कांही आक्रमणे झाली ती वायव्येकडच्या ज्या खैबरखिंडीतूनच झाली होती, ती तर आता पाकिस्तानात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकिस्तानशी सख्य नसल्यामुळे पाकिस्तानच्या सरहदीकडेच लक्ष ठेवावे लागले होते आणि आपला बहुतेक सारा फौजफाटा त्या सीमेवरच तैनात होता. चीनच्या सीमेवर हिमालय पर्वताच्या रांगा आणि निबिड जंगल यामुळे अत्यंत प्रतिकूल अशी भौगोलिक परिस्थिती होती. ब्रिटीशांना कधी तिथे सैन्य पाठवण्याची गरज पडली नसावी, त्यामुळे त्यांच्या काळात तिकडे दुर्लक्षच झालेले होते. सीमेपर्यंत पोचायला धड रस्तेसुध्दा बांधले गेले नव्हते. पं.नेहरूंच्या काळात राजकीय मंचावर "हिंदीचीनी भाईभाई" चा घोष चालला होता. साम्यवादी क्रांतीनंतर चिनी समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यात तिथले राज्यकर्ते गुंतलेले होते. या खंडप्राय देशाच्या कान्याकोप-यापर्यंत क्रांतीचे लोण पोचवणे कर्मकठिण होते. या सर्व त-हेने विचार करता चीनच्या बाजूने भारतावर अकस्मात आक्रमण होऊ शकेल असे कुणालाही स्वप्नातदेखील वाटत नव्हते. या गाफीलपणाचाच फायदा घेऊन चीनने सन १९६२ मध्ये अचानकपणे हल्ला चढवला. </p> <p>भारतीय जनतेच्या मनाला पहिल्या क्षणाला बसलेला आश्चर्याचा धक्का ओसरताच त्याची जागा संतापाने घेतली. भाईभाई करत गळ्यात गळा घालताघालताच पाठीत खंजीर खुपसण्याच्या या विश्वासघातकी कृत्यामुळे चीन हा क्षणार्धात देशाचा शत्रू बनला. ज्या चिनी लोकांबद्दल कालपर्यंत कुतूहलमिश्रित कौतुक वाटत होते त्यांना दुष्ट, क्रूर, पाताळयंत्री, माणुसकीला काळिमा वगैरे विशेषणांची लाखोली वाहिली जाऊ लागली. ब्रिटीशांच्या जमान्यातच कोलकात्याला येऊन स्थाइक झालेल्या चिनी लोकांनी तिथे एक चायना टाउन बनवले होते. पण तेवढा अपवाद सोडला तर भारतातल्या इतर शहरातल्या लोकांनी चिनी माणूस कधी पाहिला देखील नसावा. मित्र म्हणूनही त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे तो एक अमूर्त असा शत्रू बनला. त्याचा निषेध तरी कसा करायचा? त्या काळात चीनबरोबर फारसा व्यापार होत नव्हता. त्यामुळे त्यावर बहिष्कार तरी कसा घालणार आणि चिनी वस्तूंची होळी पेटवण्यासाठी काय जाळणार? कागदावर माओ आणि चौ यांची चित्रे काढून आणि कापडांच्या बुजगावण्यावर त्यांची नांवे लिहून त्यांचे जागोजागी दहन करण्यात आले.</p> <p>चिनी लोकांवर राग काढणे कठीण असल्याची कसर सरकारवर चिडून व्यक्त करण्यात आली. नेभळट, बावळट, पुळचट, अदूरदर्शी, मूर्ख वगैरे शेलक्या विशेषणांनी सरकारची संभावना करण्यात आली. त्या काळात देशापुढे कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसपुढे पं.नेहरूजींना पर्यायच नव्हता. त्यांची जागा घेऊ शकणारे दुसरे कोणी नजरेसमोर नसल्यामुळे ते वाचले पण संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांना जावे लागले. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जागी केंद्र सरकारमध्ये बोलावून घेतले गेले. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धांवून गेला अशा शब्दांत त्या घटनेचे वर्णन केले गेले. चीनने केलेल्या आक्रमणाच्या प्रतिकारासाठी तांतडीने उपाययोजना करण्यात आल्या. सैन्याची कुमक आणि त्याला लागणारी शस्त्रास्त्रे, दारूगोळा, अन्नधान्य, कपडेलत्ते, औषधपाणी वगैरेंची रसद सरहदीकडे रवाना करण्यात आली. पण सीमाभागातली दळणवळणाची साधने अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे ती तिथपर्यंत पोचण्यात अनंत अडचणी होत्या. त्यामुळे जेथपर्यंत रस्ते होते तेथपर्यंत जाऊन त्या ठिकाणची ठाणी मजबूत करणे एवढेच ताबडतोब करण्यासारखे होते. </p> <p>दुर्गम भागातल्या या दळणवळणाच्या अडचणी चिनी सैन्यापुढेही होत्याच. पण त्यांनी कित्येक महिने आधीपासून गुपचुपपणे तयारी करून पुरेसा साठा त्यांच्या भागात करून ठेवला असणार. सगळी तयारी झाल्यानंतर त्यांनी मोठ्या संख्येने सीमेवरील अनेक आघाड्यांवर एकदम हल्ला चढवला आणि मिळतील तेवढी छोटी छोटी भारतीय ठाणी उध्वस्त करीत ते धीमेधीमे पुढे चाल करीत राहिले. दोन्ही सैन्यांची अमोरसमोर येऊन हातघाईची लढाई अशी झालीच नाही. कांही दिवसांनी चिन्यांनी आपण होऊन युध्दविराम जाहीर केला. त्यांच्या सैन्यावर प्रतिहल्ला चढवून तिला सीमेपलीकडे हाकलून देण्याएवढी लष्करी शक्ती आपल्या सैन्याकडे त्या वेळेस नव्हती आणि भौगोलिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्यामुळे असले धाडस करण्यात कांही अर्थ नव्हता. त्यामुळे झाली तेवढी मानहानी पत्करून ती लढाई तिथेच थांबवणे भाग पडले.</p> <p>हळूहळू या युध्दाचे तपशील पुढे येत गेले. ज्या भागात चिनी सैन्याने चढाई केली होती तो सगळा अत्यंत विरळ लोकवस्ती असलेला जवळजवळ निर्जन असा प्रदेश होता. त्या दुर्गम भागाचा बाह्य जगाशी कसला संबंधच नव्हता. त्या भागात कशाचेच उत्पादन होत नव्हते, त्यामुळे तिथून कुठलाही माल बाहेर जात नव्हता की बाहेरचा माल विकत घेणारे कोणी ग्राहक तिथे रहात नव्हते. सीमेवरचा असा थोडासा ओसाड भाग जिंकून घेतल्याने चीनला त्याचा कांहीही आर्थिक फायदा झाला नाही की भारताच्या इतर भागांचे त्यामुळे कांही नुकसान झाले नाही. दोन्ही देशांतल्या सामान्य माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात कांहीच फरक पडत नव्हता. चीनने घुसवलेले सैनिकसुध्दा अशा बर्फाच्छादित प्रदेशात अन्नपाण्यावाचून किती दिवस आणि कसे राहतील आणि अशा बिकट जागी नुसते बसून राहण्यासाठी किती काळ रसद पुरवता येईल या गोष्टींना मर्यादा येतातच. त्यामुळे कालांतराने तेही मायदेशी माघारी गेले. या लढाईत दोन्ही बाजूचे कित्येक लढवय्ये मारले गेले. हे भरून न येण्याजोगे नुकसान करून चीनने काय मिळवले हे एक अगम्य कोडे आहे. कदाचित राजकारणाच्या पटावर त्याचा घसघशीत लाभ चीनला त्या काळात मिळाला असेल. </p> <p>कागदावर काढलेल्या नकाशावर रेघा मारून सीमा दाखवणे सोपे असले तरी दुर्गम भागात प्रत्यक्षात त्या कोठे आहेत ते ठरवणेसुध्दा कठीण असते. ज्या ठिकाणी माणूस पोंचूच शकत नाही तिथला सर्व्हे करून, तिथे खुणा कशा करणार किंवा तिथे कुंपण कसे घालणार? "उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंचइंच लढवू" वगैरे गाण्यात छान वाटते. प्रत्यक्षात तो इंच कोठपासून मोजायचा तो बिंदूच सापडत नाही. खाजगी मालमत्तेमध्येसुध्दा जेवढ्या प्रदेशात माणसांचा वावर असतो तेथपर्यंतच तो आपला मालकी हक्क बजावू शकतो. त्यापलीकडे असलेल्या 'नो मॅन्स लँड' मध्ये जेंव्हा तो स्वतः जाऊन राहू शकत नाही, त्या वेळी दुसरा कोणी तेथे येणार नाही तेवढे त्याला काळजीपूर्वकरीत्या पहात रहावे लागते. चीन आणि भारत यांच्या सीमा हिंदुस्थानचे ब्रिटीश सरकार आणि तिबेट यांच्यात झालेल्या तहात ठरल्याप्रमाणे तयार केलेल्या नकाशाप्रमाणे ठरतात. आजचा चीन ते मान्य करायला तयार नाही. त्यामुळे सीमेवरचा कांही भाग दोन्ही देश आपापल्या नकाशात दाखवतात. प्रत्यक्षात त्यातल्या कांही भागात कोणीच वस्ती करू शकत नाही. आज तो कोणाच्या ताब्यात आहे ते नक्की सांगता येणार नाही. अशा जागेवर फक्त जंगलचा कायदा चालतो. त्यातल्या त्यात थोडे सौम्य हवामान असलेल्या मोक्याच्या जागी राहुट्या बांधून कांही सैनिकांच्या तुकड्या तिथे मुक्काम ठोकतात आणि आजूबाजूचे निरीक्षण करीत असतात. शत्रूने देशाच्या आंतपर्यंत शिरू नये याची खबरदारी घेण्यासाठी हे जरूरीचे असते.</p> <p>या सगळ्या गोष्टींची जाणीव हळूहळू होत गेली, सीमेवरील भागात रस्तेबांधणी आणि विकासाची कामे झाली, त्या भागातली गस्त वाढली आणि १९६२ च्या युध्दात झालेल्या मानहानीचे शल्य मनातून फिकट होत गेले, तसतशी चिनी लोकांबद्दल मनात बसलेली आढी सौम्य होत गेली. त्यानंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीच्या मनात त्या युध्दाची आठवणदेखील असणार नाही. त्यामुळे ती अधिक मोकळेपणाने विचार करू शकते.</p> <p><br />. . .. . . . . . . . . . (क्रमशः)</p>]]></description>
<pubDate>Sun, 17 Aug 2008 05:50:00 GMT</pubDate>
</item>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ८४  चीन, चिनी आणि चायनीज]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1480</link>
<description><![CDATA[<p>बीजिंग येथे चालू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवाचा अतिभव्य उद्घाटनसोहळा पहात असतांना नकळतच मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मागे मागे जात होते. आमच्या लहान गांवात पंजाबी किंवा तामिळ माणूससुध्दा पहायला मिळत नव्हता तिथे चिनीजपानी कोठून दिसणार? रात्रीची गस्त घालणारे एक दोन गुरखे होते, त्यांचे चेहेरे पाहून मंगोलियन वंशाच्या लोकांबद्दल थोडी कल्पना येत असे. गोष्टींच्या पुस्तकांमधल्या चिनी लोकांचे बसके चेहेरे, मिचमिचे डोळे, फुगीर गाल, नकटे नाक, डोक्यावरचा अंबाडा, विचित्र दाढीवर लोंबत्या मिशा, पायघोळ लोळणारे कमालीचे ढगळ कपडे वगैरेंनी बनलेले त्यांचे 'ध्यान' पाहून गंमत वाटत असे. त्यांची लिपी पाहून ते चित्र आहे की अक्षर याचा संभ्रम पडे, प्रत्येकी दहा बारा शेंड्या आणि शेपटे असलेले प्रत्येक अक्षर एक वेगळी कलाकृती वाटे आणि अशी किचकट अक्षरे काढून कांहीही लिहायला किती वेळ लागत असेल याची कल्पना करवत नसे. कदाचित त्यामुळेच कागदावर कांही लिहिण्यापेक्षा त्याचा पतंग करून तो उडवणे अनेकांना अधिक आवडत असावे. 'च्याओ, म्याव' किंवा 'लिंग, पिंग' असली त्यांची नांवे वाचून ते पुरुषाचे असेल की बाईचे ते समजत नसे, कदाचित ते त्यांच्या गांवाचे किंवा खाद्यपदार्थाचेदेखील असण्याची शक्यता असे. कावळे-चिमण्या, उंदीर-मांजर, साप-विंचू असले कसलेही जीव ते सरसकटपणे जेवणात खातात हे ऐकल्यावरच कसेसे वाटून पोटात ढवळत असे. अशा या मुलखावेगळ्या चिनी लोकांच्याबद्दल मनात नेहमीच एक गूढ वाटत असे.</p> <p>घरातल्या कपबशा 'चिनी' मातीच्या असत. त्यामुळे या पीतवर्णी लोकांच्या देशातली मातीसुध्दा पांढरी असते की काय असा प्रश्न पडे. पुढे भूगोल शिकतांना तिथेही सुपीक प्रदेश आहेत आणि त्यांवर चांगल्यापैकी भातशेती होते वगैरे वाचले. आपल्या भारताच्या अडीचपट क्षेत्रफळ असलेला हा देश अस्ताव्यस्त पसरलेला आहे, लोकसंख्येच्या बाबतीत तर तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पण एवढ्या विस्तीर्ण भूभागावर राहणारी इतकी सारी माणसे एकच भाषा बोलतात याचे प्रचंड आश्चर्य वाटत असे. आपल्याकडे वीसबावीस वेगवेगळ्या भाषा आहेत आणि प्रत्येकीच्या दहाबारा तरी बोली बोलल्या जातात. आज शिक्षणाच्या प्रसारामुळे नागपूर, कोल्हापूर आणि डहाणूकडचे लोक एकच प्रमाण मराठी भाषा वेगवेगळे हेल काढून बोलतात, पण दर पंधरा कोसांवर भाषा बदलते अशी जुन्या काळातली समजूत होती. चिनीमध्येसुध्दा अशा अनेक बोली असतील, पण एकच भाषा देशभरात सगळीकडे पसरवली गेली हे कौतुकाचे आहे.</p> <p>भारताप्रमाणेच चीनलासुध्दा हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे या साम्यामुळे एक प्रकारची आपुलकी वाटत असे. आपल्या गौतमबुध्दाच्या शिकवणुकीचा चीनच्या लोकांवर प्रभाव पडलेला आहे हे वाचतांना कॉलर ताठ होत असे. पण सर्वभक्षी चिनी लोकांनी अहिंसेचा उपदेश करणा-या गौतमबुध्दाचे कोणते विचार घेतले असतील ते कांही समजत नसे. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे युरोपियन लोकांनी चीनच्या किनारपट्ट्यांवरचा थोडा मुलुख आपल्या ताब्यात घेऊन त्यांवर वसाहती बांधल्या होत्या आणि दुस-या महायुध्दाच्या काळात थोड्या दिवसांसाठी जपान्यांनी चीनचा बराच मोठा प्रदेश काबीज केला होता तेवढे अपवाद वगळता चीन हा देश नेहमी स्वतंत्रच राहिला. रेशमाची वस्त्रे, कागद, सुरुंगाची दारू अशा अनेक वस्तू चीनने जगापुढे आणल्या असे सांगतात. चीनबद्दलची सर्वात अधिक प्रसिध्द असलेली गोष्ट म्हणजे चीनची हजारो मैल दूर पसरलेली ऐतिहासिक भिंत. डोंगर द-या पार करत जाणारी एवढी लांबलचक, उंच आणि भरभक्कम भिंत यांत्रिक साधने नसतांनाच्या काळात माणसांच्या श्रमातून उभी केली गेली आणि ती इतकी मजबूत आहे की अजूनपर्यंत टिकून राहिली आहे. एकंदरीतच चीनबद्दल कुतूहल वाटत असे आणि त्या मानाने फारच थोडी माहिती मिळायची. त्यामुळे " या बांबूच्या पडद्याआड दडलंय काय?" असा प्रश्न मनात रेंगाळत असे.</p> <p>पंडित नेहरूंच्या परराष्ट्रधोरणात त्यांनी चीन या शेजारी देशाला खूप महत्व दिले होते. भारताला ब्रिटीशांकडून नुकतेच स्वातंत्र्य मिळाले असल्यामुळे वसाहतवादी पाश्चिमात्य देशांपासून त्याने अंतर बाळगणे साहजीकच होते. आकारमान, वैविध्य, नैसर्गिक रचना आणि त्यातून येणारी संकटे वगैरे अनेक बाबतीत भारत व चीन या दोन देशात बरेच साम्य असल्यामुळे त्यांना एकमेकांची मदत घेता येईल असा कयास त्यांनी बांधला असणार. या दोन्ही देशांतील लोकांनी इतिहासकाळात सुवर्णयुगे पाहिलेली असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन नव्या युगात चमत्कार घडवावा असे मनातले मांडे ते खात असावेत. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मिळून 'पंचशील' या नांवाने कांहीतरी केले होते. तो एक करार होता की ती एक विचारसरणी होती ते त्या वेळी मला समजले नव्हते. पंडित नेहरूंना अभिप्रेत असलेला समाजवाद आणि माओचा साम्यवाद यातला फरक कळण्याचे माझे वय त्या काळी नव्हते. एकंदरीत 'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणा त्या काळात लोकप्रिय होती.</p> <p>असे सुरळीत चालले असतांना काय झाले कोणास ठाऊक चीनने भारतावर लष्करी आक्रमण केले असल्याची बातमी आली आणि सगळीकडे हलकल्लोळ उठला.</p> <p>. . .. . . . . . . . . . (क्रमशः)</p> <p></p>]]></description>
<pubDate>Thu, 14 Aug 2008 12:50:55 GMT</pubDate>
</item>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ८३ आमच्या छकुल्या (भाग ४)]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1475</link>
<description><![CDATA[<p>आता आमच्या छकुल्या पांच वर्षांच्या झाल्या आहेत. वयाबरोबर त्यांची समजशक्ती आणि समजुतदारपणा वाढला आहे. त्याबरोबर सगळे कांही समजून घेण्याची जिज्ञासा अपार वाढली आहे. कुठल्याही प्रश्नाचे त्यांना समजेल आणि पटेल असे उत्तर मिळेपर्यंत त्या पिच्छा सोडत नाहीत. त्यांना आता काऊचिऊ, कुत्रामांजर यांच्यापेक्षा जिराफ, झेब्रा, अजगर आणि देवमासा अशा प्राण्यांबद्दल कुतुहल वाटते. त्यांची चित्रे पाहून त्या या प्राण्यांना ओळखतातच, शिवाय ते प्राणी काय खातात आणि कसे ओरडतात वगैरेसारखे प्रश्न त्या विचारतात. त्यांना प्राणीसंग्रहालयात नेऊन कांही वेगळे प्राणी दाखवता येतील, त्यावेळी त्या प्राण्यांनी खाण्यासाठी किंवा ओरडण्यासाठी आपले तोंड उघडले तर नशीब!</p> <p>एकदा मी बसलो आता इरा मागून आली आणि माझ्या टकलावरून हात फिरवत म्हणाली," आजोबा, तुझे केस कुठे गेले?" <br />या अचानक आलेल्या प्रश्नाला मी कांहीतरी उत्तर द्यायचे म्हणून सांगितले, "अगं, वा-याने थोडे थोडे उडून गेले." <br />या उत्तराने तिचे समाधान झाले नाही. आपल्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली, "हे पहा, माझे केस किती छान वाढतातहेत. तुझेच कसे उडून गेले?" <br />मी सांगितले, "तुझे केस कसे छान काळेभोर आणि दाट आहेत, तसे माझे नाहीत ना! माझे तर पांढरे आणि हलके झाले आहेत, म्हणून ते उडून जातात. " <br />" पण तुझे केस असे पांढरे आणि पातळ कां झाले?" लगेच पुढला प्रश्न आला. <br />"मी आता ओल्ड झालोय ना, म्हणून. " <br />"पण तू ओल्ड कशाला झालास?" <br />काय सांगावे ते मला सुचेना. "वयानुसार सगळेच म्हातारे होतात." असे सांगून तिला भीती घालायची माझी इच्छा नव्हती. मी सांगितले, "खरं म्हणजे चुकलंच माझं! " <br />"मग सॉरी म्हण. " <br />इराच्या या वाक्याचा अर्थ मला लागत नाही असे पाहून ईशाने स्पष्टीकरण दिले, "अरे आजोबा, कुणाचं चुकलं असलं तर त्यानं सॉरी म्हणायचं असतं. एवढं पण तुला ठाऊक नाही कां?" <br />"अरे हो, मी तर विसरलोच होतो. पण मी कुणाला सॉरी म्हणू?" मी विचारलं. <br />"कुणाला नाही तर देवबाप्पाला सॉरी म्हण, म्हणजे तो तुला पुन्हा केस देईल." तिचे आशावादी विश्व सरळ सोपे होते. त्याला तडा द्यावा असे मला वाटले नाही. पण थोडी वस्तुस्थिती मान्य करता यायला हवी. म्हणून मी सांगितले, "देवबाप्पा म्हणतो की तुला आजोबा व्हायचं असेल तर आधी म्हातारा व्हायला पाहिजे. तुम्हाला ओल्ड आजोबा चालेल ना?" "ओके", " ओके" म्हणत त्यांनी तो संवाद थांबवला.</p> <p>आता त्या मैसूरला रहायला गेल्या आहेत. पुण्याच्या सेंट मेरी कॉन्व्हेंटमधून एकदम तिथल्या पुष्करणी बालोद्याना शाळेत गेल्याने त्यांना कल्चरल शॉक वगैरे बसेल अशी आम्हला भीती वाटत होती. पण तसे कांहीच झाले नाही. इथे जुन्या शाळेतल्या मैत्रिणी नाहीत म्हणून थोडी कुरकुर केली, पण तेवढीच. आता त्यांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि कन्नड या चार भाषा आणि गणित, सामान्य ज्ञान, चित्रकला वगैरे विषय आहेत. त्यांची पुस्तके आणि वह्या मिळून अठरा आयटमचे गांठोडे पाहून आम्हालाच घाम फुटला होता. त्याशिवाय घरी मराठी बोलायचे शिक्षण चाललेच असते. त्यामुळे आम्ही त्यांना हवे तसे बोलू देतो. त्यातल्या व्याकरणाच्या चुका काढून आणि आदरार्थी बहुवचन वगैरेचा घोळ घालून त्यांना बोलतांना आडवत नाही. एकदा मनात आलेले विचार मांडता येणे जमू लागले की बाकीच्या गोष्टी हळू हळू जमतील. </p> <p><br />सिंड्रेला, स्नोव्हाइट वगैरेंच्या परीकथांच्या जगातून त्या पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, पण आता माणसांच्या जगातल्या कांही गोष्टी ऐकायला आणि सांगायला लागल्या आहेत. त्यांना आता अक्षरज्ञान झाले असले आणि बोलतांना शब्द जुळवून वाक्यरचना करता येऊ लागली असली तरी अजून पुस्तक वाचता येत नाही. त्यामुळे गोष्टींच्या पुस्तकांतल्या गोष्टी त्यातल्या चित्रांच्या आधारानेच सांगाव्या लागतात. एका चित्रात एक पोलिस एका चोराचा पाठलाग करतो आहे असे दाखवले होते त्याप्रमाणे मी इराला सांगितले. त्यावर तिने विचारले, "तुला हे कसे समजले?" <br />मी म्हंटले, "ते तर अगदी सोप्पं आहे. मागून धांवणा-या या पोलिसाने त्याचा युनिफॉर्म घातला आहे. हा बघ! " <br />" पण मग चोर युनिफॉर्म कां नाही घालत?" <br />खरेच सगळ्या गुन्हेगारांनी विशिष्ट गणवेष घातले असते तर किती बरे झाले असते ना?</p> <p>अशा आहेत आमच्या गोड छकुल्या. चिवचिवाट करून मन रमवणा-या आणि मध्येच न सुटणारे प्रश्न विचारून निरुत्तर करणा-या.</p>]]></description>
<pubDate>Wed, 13 Aug 2008 01:12:43 GMT</pubDate>
</item>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ८२ आमच्या छकुल्या (भाग ३)]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1472</link>
<description><![CDATA[<p>आमच्या छकुल्या हा लेख मी दोन भागात पूर्वी लिहिला होता. गेल्या वर्षभरातले गोड अनुभव पुढील दोन भागात देत आहे.</p> <p>आमच्या ईशा आणि इरा या दोन व तीन वर्षांच्या झाल्या त्या वेळचे त्यांचे वाढदिवस त्या इंग्लंडमध्ये असतांना आले. तिथल्या भारतीय मित्रमैत्रिणींना बोलावून भारतात करत असायचे तशाच पध्दतीनेच ते तिथे साजरे केले गेले. आम्हीही टेलीफोन, इंटरनेट, वेबकॅम वगैरे माध्यमातून त्यात जेवढा सहभाग करता आला तेवढा करून घेतला. चौथ्या वर्षपूर्तीच्या दिनापर्यंत त्या भारतात आल्या होत्या आणि पुण्याला आमचे जाणे येणे सारखे चाललेले असे. त्यामुळे वाढदिवसाला जाणे झालेच.</p> <p>आजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या 'श' आणि 'र' चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या "सोळा जूनला माझा बड्डे आहे." असे सांगताहेत. 'सोळा' ही एक 'संख्या' आहे आणि 'जून' हे एका 'महिन्या'चे नांव आहे एवढे कळण्याइतकी समज त्यांना त्या काळात आलेली नव्हती कारण संख्या आणि महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसणार, पण 'बड्डे' म्हणजे 'धमाल' एवढे त्यांना पक्के समजलेले होते. त्या दिवशी छान छान कपडे घालायचे, हॉलमध्ये भिंतीवर रिबिनी, फुगे वगैरे लावायचे, खूप मुलांना जमवून मनसोक्त दंगा करायचा, केक कापायचा, 'हॅपी बर्थडे'चे गाणे म्हणायचे, टाळ्या वाजवायच्या, यम्मीयम्मी गोष्टी खायच्या. मग सगळे त्या 'बड्डे बॉय' किंवा 'बड्डे गल्' ला 'विश' करतात, त्यांना 'प्रेसेंट्स' देतात वगैरे सगळा तपशील त्यांना पाहून पाहून ठाऊक झाला होता. त्यामुळे आपले वाढदिवस नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटायचे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे साग्रसंगीत वाढदिवस 'सेलिब्रेट' करीत असत.</p> <p>आता त्या शाळेत जायला लागल्या होत्या. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी शाळेचा गणवेश न घालता नवा ड्रेस घालून आणि शाळेत वर्गातल्या मुलींना वाटण्यासाठी चॉकलेट्सचे डबे घेऊन त्या शाळेला गेल्या. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या वर्गात पहिला वाढदिवस त्यांचाच आला होता का काय कोण जाणे, शाळेत बर्थडे कसा साजरा करतात हे त्यांनाही ठाऊक नव्हते आणि आम्हालाही. शाळेतून घरी परत आल्यावर त्यांनी थोडक्यात शाळेतली गंमत सांगितली पण त्या थोड्याशा हिरमुसलेल्या वाटल्या. खोदून खोदून विचारल्यावर ईशाने सांगितले, "स्कूलमध्ये आपला बड्डे झाला, पण त्याची पाट्टीच नाही झाली!" या वर्षीचा वाढदिवस हा असाच होणार की काय असे तिला वाटले होते. "हा फक्त शाळेतला बर्थडे झाला, आतां संध्याकाळी आपण घरी पार्टी करू, त्यात तुमचे फ्रेंड्स, अंकल, आँटी वगैरे खूप लोक येणार आहेत. त्यावेळी घालायसाठी दुसरे नवीन ड्रेस आणले आहेत. तेंव्हा आपण नाच, गाणी, खेळ वगैरे सगळे करायचे आहे. " असे समजावून सांगितल्यानंतर कुठे त्यांची कळी खुलली. <br /></p>]]></description>
<pubDate>Tue, 12 Aug 2008 12:25:12 GMT</pubDate>
</item>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ८१ लेने के देने]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1471</link>
<description><![CDATA[<p>कालच ईमेलवरून एक मजेदार चुटका आला. अशा गोष्टी अमेरिकेतच घडू शकतात असे वाटल्याने त्याचे भाषांतर करतांना भारतीयीकरण केले नाही. फक्त गोष्टीमध्ये थोडा बदल करून तिचा बराच विस्तार केला आहे.</p> <p>ही एका अमेरिकन 'धनिकवणिकबाळा'ची गोष्ट आहे. त्याचे नांव जॉन आहे असे समजू. गडगंज दौलत वारशात मिळाल्यामुळे जॉनला त-हेत-हेचे छंद लागले होते आणि त्याने राजेशाही षौक बाळगले होते. त्यामुळे उत्तमोत्तम आणि महागड्या वस्तू विकत घेण्याची संवय त्याला पडली होती. त्यासाठी त्याच्याकडे असलेले पैसे अपुरे पडत असल्यामुळे विनासायास थोडीफार जादा मिळकत करण्याची संधी तो पहात असे. एकदा एका दुकानातून त्याने अतिशय महागड्या सिगार्सचे पॅकेट खरेदी केले.  'विमा उतवण्यायोग्य वस्तू' असा शेरा त्या पॅकेटवर छापलेला असल्यामुळे त्याने लगेच त्याचा विमाही उतरवला. घरी आणल्यावर ते पॅकेट उघडल्याशिवाय तो थोडाच राहणार आहे. त्याने एका सिगारचा आस्वाद घेतला, तो त्याला इतका आवडला की दुसरी, तिसरी करत तो त्या सिगार फुंकतच राहिला. थोड्याच दिवसात ते पॅकेट रिकामे झाले. </p> <p>रिकाम्या पॅकेटकडे पाहता पाहता जॉनला एक नामी संधी सुचली. त्याने उतरवलेल्या विम्यात 'आगीपासून होणारे नुकसान' भरून निघण्याबद्दलचे कलम होते. त्याने विमा कंपनीकडे एक रीतसर अर्ज पाठवला. विमा उतरवलेली उंची सिगार्स शंभर छोट्या छोट्या आगींमध्ये जळून खाक झाल्यामुळे त्याची नुकसानभरपाई मिळावी अशी याचना करून ती न दिल्यास आपण न्यायालयात दाद मागू अशी धमकीही त्याने दिली. विमा कंपनीच्या कायदापंडितांनी कागदपत्रे तपासून पाहिली. विमा उतरवण्यायोग्य वस्तूंमध्ये त्या उंची सिगार्सची गणना होत होती. त्यामुळे त्यांचा विमा उतरवण्यात चूक झालेली नव्हती. अपघात, पाऊसपाणी, पूर, दंगेधोपे अशा कित्येक कारणांच्या जोडीने आग या कारणामुळे होणारी हानी भरून देण्यात येईल असे कलम त्या करारपत्रात होते. आगीच्या स्वरूपाबद्दल कोणताच खुलासा नव्हता. लहानात लहान ती केवढी असावी हे स्पष्ट केलेले नव्हते. त्यामुळे या सगळ्याचा कीस न्यायालयात निघाला तर आपली बाजू लंगडी पडेल, तसेच निष्कारण त्यावर खर्च करावा लागेल आणि शेवटी आपलेच हंसे होण्याची शक्यता आहे वगैरे गोष्टी त्यांच्या नजरेस आल्या. त्यापेक्षा त्या गृहस्थाला विम्याची रक्कम देऊन टाकणे इष्ट आहे असे ठरवून त्यांनी पूर्ण रकमेचा चेक त्याला पाठवून दिला.</p> <p>विम्याची रक्कम मिळताच जॉन खूष झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी तो बाहेर जाऊन मौजमजा करण्यावर आणखी पैसे उधळून आला. परत येतो तो त्याच्या घराबाहेर त्याची वाट पहात पोलिस उभे होते. "माझा काय गुन्हा आहे?" असे विचारताच "तुझ्याविरुध्द फौजदारी गुन्हा नोंदवला गेला आहे." असे उत्तर मिळाले. जॉन चाटच पडला. त्याचे मनमौजी वागणे कसेही असले तरी तो कायद्याची चौकट न ओलांडण्याची खबरदारी घेत आला होता. "आपल्या पैशाची आपण उधळपट्टी केली तर त्यात कुणाच्या बापाचे काय जाते?"  असा प्रश्न त्याला पडला. त्याने पुन्हा विचारले, "माझ्याविरुध्द कोणता गुन्हा केल्याची तक्रार आहे?"<br />इन्स्पेक्टरने सांगितले, "तू ज्या वस्तूंचा विमा उतरवला होतास त्यांची शक्य तेवढी काळजी घेणे हे तुझे कर्तव्य होते. अपघाताने जर त्याला एकादी आग लागली असती तर ते समजण्यासारखे होते, पण तुझ्या घरी त्यांना शंभर वेळा आगी लागल्या तेंव्हा प्रत्येक वेळी तू काय झोपा काढत होतास? पहिल्यांदा लागलेली आग विझवण्यासाठी तू कोणते प्रयत्न केले होतेस?  पुन्हा ती लागू नयेस यासाठी कोणती उपाययोजना केली होतीस? आग लागल्याची खबर तू पोलिसात एकदासुध्दा कां दिली नाहीस? ती आग पसरली असती तर किती नुकसान झाले असते?" वगैरे प्रश्नांची सरबत्ती करून " या सगळ्या प्रश्नांची लेखी उत्तरे आम्हाला हवी आहेत." असे त्याला बजावले.</p> <p>या प्रश्नांना काय उत्तर द्यावे तेच जॉनला सुचेना. आपल्याकडे शंभर वेळा छोट्या छोट्या आगी लागल्या असे विधान तो लेखी देऊन चुकला होता. आता त्याला ते नाकारता येत नव्हते. शंभर वेळा आगी लागल्या आणि त्याने त्या लागू दिल्या यात त्याचा निष्काळजीपणा तर होताच, पण तो स्वतः त्या कृत्यात सहभागी असावा असा संशय कोणालाही येईल. तो त्याचे खंडन कसे करणार होता? त्याचे आग लावणे किंवा त्या गोष्टीला प्रोत्साहन देणे, त्यात मदत करणे वगैरे सिध्द झाले तर त्याची गणना दहशतवादी कारवाया करणा-या 'आतंकवादी' लोकात होऊ शकली असती. या सगळ्या घोळातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःच ते सिगार ओढले असल्याचे कबूल केले. "विमा उतरवलेल्या वस्तूंना आग लावून ती नष्ट करणे." या गुन्ह्यासाठी त्याला जबरदस्त दंड ठोठावला गेला आणि 'लेनेके देने पड गये।'</p> <p> </p>]]></description>
<pubDate>Mon, 11 Aug 2008 10:55:39 GMT</pubDate>
</item>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ८० भाषा आणि परिभाषा]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1469</link>
<description><![CDATA[<p>'विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान' या विषयावर एक तेख मी उपक्रम या संकेतस्थळावर दिला होता. या लेखावर बरेच प्रतिसाद आले. विशेषतः दोन विद्वान सदस्यांमध्ये झालेल्या संवादातून त्यात मोलाची भर पडली.  या प्रतिसादांवर विचार करतांना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तिचा थोडासा विस्तार मी या लेखात करणार आहे.  'भाषा' या विषयाचा आवाका तसा खूपच मोठा आहे.  मी त्याचा अभ्यासही कधी केलेला नाही. त्यामुळे या लेखाचा विषय फक्त माझ्या पूर्वीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांचा भाषेच्या अनुषंगाने परामर्श घेणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे. </p> <p>बहुतेक भाषांमध्ये कांही शब्दांना अनेक अर्थ असतात तर कांही वेळा एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात, पण त्या अर्थांना भिन्न छटा असतात. जो शब्द नेहमी वापरात असतो तोच बोलतांना आपल्याला पटकन सुचतो. लिहितांना थोडा विचार करून योग्य असा शब्द लिहिण्याचा प्रयत्न आपण करतो. कधी पुनरुक्ती टाळण्यासाठी किंवा यमक, अनुप्रास वगैरे जुळवण्यासाठी वेगवेगळे शब्द वापरतो. ते वाचकाच्या ओळखीचे नसतील तर त्या शब्दांचा आपल्याला अभिप्रेत अर्थ त्याला न समजण्याचा घोका असतो, पण अशा वेगवेगळ्या शब्दप्रयोगामुळे लेखनाची वाचनीयता वाढते. कांही वेळा श्लेष साधण्यासाठी द्व्यर्थी शब्दांचा कौशल्याने उपयोग केला जातो. एक सभ्यपणाचा आणि दुसरा चावट असे दोन अर्थ निघणारी वाक्ये स्व.दादा कोंडके यांच्या चित्रपटात नेहमी दिसत असत आणि अशा वाक्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने प्रेक्षकांची दादही मिळत असे.</p> <p>विज्ञान, तंत्रज्ञान, विधी यासारख्या क्षेत्रात आशयाच्या नेमकेपणाला अतिशय महत्व असते. त्यामुळे एकाद्या वाक्यातून दोन अर्थ निघू शकणार नाहीत याची मुद्दाम काळजी घेतली जाते. अनेक पुस्तकांत सुरुवातीला किंवा परिशिष्टांमध्ये त्यातील महत्वाच्या शब्दांची व्याख्या दिलेली असते. एकाद्या माणसाने भररस्त्यात दहा लोकांसमोर दुस-याला भोसकले आणि तो रंगेहाथ पकडला गेला असला तर त्या क्षणापासून सर्वसामान्यपणे तो माणूस 'खुनी' म्हणून ओळखला जातो. पण कायद्याच्या भाषेत तो आधी 'संशयित' असतो,  त्याच्यावर खटला भरला गेल्यावर तो 'आरोपी' होतो आणि न्यायालयाने त्याला दोषी ठरवल्यानंतर तो 'गुन्हेगार' समजला जातो असे आपण नाटक, सिनेमे आणि मालिकांमधल्या कोर्टसीन मध्ये पाहतोच.</p> <p>इंग्रजी भाषेत फोर्स, प्रेशर, स्ट्रेस, थ्रस्ट हे शब्द एरवी साधारणपणे समान अर्थाने वापरले जातात, त्याचप्रमाणे एनर्जी, पॉवर आणि स्ट्रेंग्थ या शब्दांचा उपयोग एकमेकांच्या बदल्यात होत असतो. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिभाषेत यातील प्रत्येक शब्दाची वेगळी व्याख्या आहे आणि समीकरणात वापरण्यासाठी रोमन आणि ग्रीक लिपींमधली विशिष्ट मुळाक्षरेच त्यांचेसाठी वापरली जातात. तिथे एका शब्दाच्या बदल्यात दुसरा घेतला तर गणितच चुकेल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करता करता त्याची परिभाषा कांही लोकांच्या रक्तात भिनत जाते आणि त्यांच्या विचार करण्याच्या किंवा विचार व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत ती गोष्ट जाणवते असे मला वाटते. माझे बहुतेक मराठी भाषिक मित्र वैज्ञानिक किंवा तांत्रिक विषयांवर मराठीत बोलतांनासुध्दा इंग्रजी शब्दांचाच उपयोग करतात. मी तरी अद्याप त्यांच्यातल्या कोणाच्या तोंडून 'फोर्स' व 'एनर्जी' या अर्थाने 'बल' किंवा 'ऊर्जा' हे शब्द ऐकलेले नाहीत. माझीही हीच परिस्थिती असणार. यामुळे 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन' हे शब्द ऐकतांना त्या शब्दांचे वैज्ञानिक परिभाषेतील अर्थच माझ्या नजरेसमोर येतात आणि त्या अर्थाशी विसंगत असलेल्या गोष्टी मला मान्य होत नाहीत.</p> <p>नमनाला एवढे घडाभर तेल घातल्यानंतर आपण कांही निवडक प्रतिसाद पांहू. भाषा आणि परिभाषा यांमधली सीमारेषा किती पुसट आहे याचे प्रत्यंतर यात येईल.<br /> <br />"परंतु व्हायब्रेशन्सचा मानवी मनावर परिणाम होतच नाही असे ठाम सांगणे कठीण वाटले. मधुर संगीत, कर्कश्श संगीत अगदी रातकिड्यांची किरकिर या लहरींचा मानवी मनावर परिणाम घडतो असे वाटते."</p> <p>ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला संगीत ऐकू येते.  ध्वनीचे वहन लहरींमधून होते, तसेच प्रकाशकिरणांचेही होते. आपण डोळ्यांनी प्रकाश पाहतो तसेच कानांनी आवाज ऐकतो. याशिवाय जिभेने चंव घेतो, नाकाने वास घेतो आणि त्वचेला स्पर्श जाणवतो तसेच कंपनेसुध्दा जाणवतात. या सर्व संवेदना वरील ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे जातात, तिथे त्याला त्यांचा अर्थ उमगतो आणि मनामध्ये असलेली आवडनिवड, त्या वेळची मनःस्थिती वगैरेंप्रमाणे त्याविषयी तदनुसार भावना मनात उठतात. पदार्थविज्ञानाच्या दृष्टीने संगीतामधून निघालेल्या ध्वनीलहरींचा फक्त कानापर्यंत झालेला प्रवास महत्वाचा असतो.  ध्वनी ऐकण्याचा अनुभव हा प्रत्यक्ष घडणारा अनुभव असतो. त्यात 'अंतर्ज्ञाना'चा अज्ञात असा भाग नाही. त्यामुळे ज्या अजब व्हायब्रेशन्सचा उल्लेख मी माझ्या लेखात केला आहे त्यापेक्षा हा अनुभव सर्वस्वी वेगळ्या प्रकारचा असतो. अंतर्ज्ञानातील व्हायब्रेशन्स थेट बुध्दीला किंवा मनाला जाऊन भिडतात किंवा भाग्यात (म्हणजे नक्की कुठे कोणास ठाऊक) प्रवेश करून त्याला उजळवतात असे म्हणतात!</p> <p> "स्पर्शाने उर्जेचे संक्रमण होते हे ही खरे आहेच. ......  हात जोडणे, डोक्यावरून हात फिरवणे, गळाभेट वगैरे गोष्टीतून उर्जा वाहत नाही हे कसे स्पष्ट होते? "</p> <p>भौतिकशास्त्रातल्या नियमांत ऊर्जेचे जे प्रकार येतात त्यातल्या फक्त वीज व ऊष्णता तेवढ्या स्पर्शामधून संक्रमित होतात. विजेचा धक्का क्वचित आणि अल्पकाळ बसत असल्यामुळे यातून वगळला तरी चालेल. एका व्यक्तीला ताप आला असेल तर ऊष्णता संक्रमित होते, पण तिचे प्रमाण इतके अल्प असते की ताप आलेल्या माणसाचा हात हातात धरल्यामुळे आपला हात गरम झाला असे सहसा जाणवत नाही. थंडीने गारठलेल्या माणसांच्या अंगात स्पर्शामुळे ऊब नक्कीच येते.  तेवढ्यापुरते प्रतिसादातले विधान बरोबर आहे. टाळी वाजवणे, शड्डू ठोकणे, बुक्का किंवा थप्पड मारणे अशा क्रियातून जो ध्वनी निर्माण होतो त्यातली ऊर्जा हवेत विरून जाते.  या प्रकारांमधूनसुध्दा फारच थोडी ऊर्जा एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे जाते. स्पर्शामुळे शरीरात जी स्पंदने निर्माण होतात, हृदयाचे ठोके वाढतात त्या प्रकारच्या गोष्टी वाचनातूनसुध्दा घडतात. त्यावेळी कोठलाही बाह्य स्रोत नसतो. त्या शारीरिक क्रियांसाठी लागणारी (भौतिकशास्त्रातली) सर्व ऊर्जा त्या माणसाने खाल्लेल्या अन्नापासून त्याला मिळत असते. अंगात उत्साह भरला, वीरश्री संचारली, शक्तीपात झाला वगैरे गोष्टींचा कॉन्झर्वेशन ऑफ (फिजिकल) एनर्जीशी कांही संबंध नसतो. माणसाच्या मनातला जोम किंवा त्याच्या अंगातली (स्नायूमधली) शक्ती या गोष्टी एनर्जीच्या परिभाषेतल्या व्याख्येत येत नाहीत, पण साध्या भाषेत सर्रास त्यांचा वापर होतो.</p> <p>"एखादा मनुष्य बोलताना "स्वतःच्या संवेदनशक्तीचा किंवा सहनशक्तीचा" उल्लेख करतो. ही शक्ती नेमकी कशी मोजावी यासाठी भौतिकशास्त्राचे सूत्र किंवा परिमाण लागू होईलच असे नाही."</p> <p>या वाक्यात 'शक्ती' या शब्दाचा उपयोग 'क्षमता' या अर्थाने केला गेला आहे. विज्ञानाच्या परिभाषेतल्या 'पॉवर' या अर्थाने नाही. ज्या गोष्टीचा उपयोग ज्या परिमाणात मोजला जातो त्याच परिमाणात तिची क्षमता व्यक्त करतात. उदाहरणार्थ : पिपाची क्षमता लीटरमध्ये. कांही गोष्टींची क्षमता सुरक्षित वापराच्या दृष्टीने दिली जाते.  लिफ्टमध्ये इतक्याच माणसांनी यावे, पुलावरून एवढ्याच वजनाचे वाहन न्यावे वगैरे. ही जड वस्तूंची उदाहरणे झाली. संवेदनक्षमता किंवा सहनशक्ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मला इतका सूक्ष्म आवाज ऐकू येतो किंवा एवढा उजेड सहन होत नाही. या उदाहरणात आपण डेसिबल किंवा ल्यूमेन ही एकके वापरू शकतो. पण नर्म विनोद समजणे किंवा संताप सहन न होणे अशा गोष्टीत विनोद आणि संताप या अंकात न मोजता येणा-या बाबी आहेत. या गोष्टींचा अनुभवाने अंदाज बांधू शकतो पण तो व्यक्त करता येत नाही. मुलाच्या बौध्दिक विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी त्याची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वगैरे मोजण्याच्या पध्दती निघाल्या आहेत. अमूक इतक्या प्रश्नांची अमूक इतक्या वेळात बरोबर उत्तरे देण्यावरून त्या मुलाचे बुध्द्यांक काढले जातात. या उदाहरणातही भाषा आणि परिभाषा यातला भेद दिसतो.</p> <p><br />"पण त्या नीट समजण्यासाठी उच्च दर्जाच्या गणिताची बैठक तसेच जेवढी कुशाग्र बुध्दीमत्ता लागते त्यांची अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून करता येणार नाही.<br />हे वाक्य पटले नाही, पण बहुधा केवळ शब्दांच्या निवडीतला फरक असावा." </p> <p>आईन्स्टाईनचा सापेक्षतेचा सिध्दांत सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शिकवला जात नाही हा माझ्या लिखाणातला महत्वाचा मुद्दा होता. तो कां शिकवत नाहीत याचे एक कारण माझ्या अंदाजाने मी दिले होते. ते दिले नसते तरी चालले असते.  सगळ्याच माणसांना परमेश्वराने ( किंवा निसर्गाने) भरपूर ग्रे सेल दिलेले असतात, पण मेंदूमधल्या फारच थोड्या पेशींचा माणूस प्रत्यक्षात वापर करतो असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार माझी शब्दरचना परफेक्ट नाही. हा शब्दांच्या निवडीतला फरक मला मान्य आहे.</p> <p>"उर्जा कशाकशातून निर्माण होते हे शास्त्रीय दृष्ट्या सांगता येत असेल, पण काही उर्जा / कंपने त्याचा परिणाम शरिरावर होतो याचे विश्लेषन करता येते का ? आणि त्यामुळे खरे विज्ञान बाजूला पडेल की माहित नाही पण अशा उर्जांबद्दल अनेकदा आपण ऐकत असतो, मला उल्लेख करण्याचा मोह होतो तो 'रेकी' या उर्जेचा... क्षणभर अशी एक उर्जा बाहेर पडते असे ग्रहीत धरले तर त्याच्या आदराबरोबर विश्लेषन केले पाहिजे म्हणजे विज्ञानाची वाट मोकळी होईल असे वाटते."</p> <p>ऊष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत आदि ज्या उर्जांचा विचार विज्ञान व तंत्रज्ञानात केला जातो त्यांचा मानवी शरीरावर कसकसा आणि किती परिणाम होतो याबद्दल फार पूर्वीपासून संशोधन होत आले आहे आणि ते चाललेच राहील. यातील निष्कर्ष प्रसिध्द केले जातात एवढेच नव्हे तर त्या आधारांवर त्या ऊर्जेचा वापर करण्यावर प्रतिबंधात्मक नियम केले जातात. विजेचा प्रवाह, बॉयलरमधील वाफेचा दाब, किरणोत्सर्गी स्रोतांचा वापर याबद्दल कायदे केलेले आहेत.  भौतिकशास्त्रात ऊर्जेचे मापन तिच्या दृष्य परिणामांवरून केले जाते. थर्मॉमीटरमधील पा-याचे प्रसरण, विद्युतचुंबकीय परिणामामुळे सुईचे फिरणे वगैरे उपकरणांद्वारे मोजमापे घेऊन त्या ऊर्जेची तीव्रता ठरवली जाते.<br />रेकी, फेंगशुई, वास्तूशास्त्र यासारख्या शास्त्रांच्या क्षेत्रामध्ये 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' या शब्दांचा जो उपयोग केला जातो त्या संकल्पनाच वेगळ्या असतात. त्या शुध्द, अशुध्द, लाभदायक, हानिकारक वगैरे असतात आणि तडक मनाला किंवा भाग्याला जाऊन भिडतात. त्यांना भौतिकशास्त्राचे कोणतेच नियम लागू पडत नसल्यामुळे त्या बाह्य उपकरणांद्वारे कशा मोजता येणार? त्यातले तज्ज्ञ जे सांगतील तेवढेच आपण ऐकू शकणार. याबाबतीतली त्यांची परिभाषाच वेगळी असते..</p> <p>परीकथांमध्ये एक वेगळी परिभाषा असते. त्यातल्या प-या, राक्षस आणि चेटकिणी त्याप्रमाणे वागतात.  पण ते काल्पनिक असते हे लहान मुलांनादेखील ठाऊक असते. माझ्या लहानपणी ज्या धार्मिक कथा सांगितल्या जात असत त्यांचीसुध्दा एक विशिष्ट परिभाषा होती. वरदान, शाप, दृष्टांत, सिध्दी, मंत्रतंत्र, अंतर्ज्ञान, दिव्यदृष्टी, पापक्षालन, पुण्यसंचय, पूर्वजन्म अशासारख्या संकल्पनांमधून सगळ्या चमत्कारांचे व्यवस्थित स्पष्टीकरण केले जात असे. त्याबद्दल शंका घेण्याची कोणाची प्राज्ञा नसे. त्या कथांचा दाखला देऊन आज घडणा-या घटनांचे स्पष्टीकरण केले जात असे. कांही लोक मंतरलेला गंडा, दोरा वगैरे बांधत, अंगारा लावत आणि त्यापासून आपले संरक्षण होईल किंवा भरभराट होईल अशी त्यांची श्रध्दा असे. हे नेमके कसे घडते ते समजण्याची तेंव्हा आवश्यकता नव्हती. शिक्षणाच्या प्रसारानंतर लोकांना थोडे प्रश्न विचारायचे धैर्य आले आहे. तसेच फेंगशुई व रेकीसारख्या कांही विद्या परदेशातून आल्या आहेत. कदाचित त्यामुळे  'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' अशा सायंटिफिक व आधुनिक वाटणा-या शब्दांचा उपयोग करणे सुरू झाले असावे.</p> <p>एका प्रतिसादात  "अस्पृश्य असे कांहीच नाही " असे म्हंटले आहे. त्याच्याशी मी सहमत आहे. माझ्या लेखात लिहिल्याप्रमाणे माझ्या ज्ञानज्योतीच्या मिणमिणत्या उजेडात जेवढे मला स्पष्ट दिसते ते 'आहे' असे मी खात्रीपूर्वक सांगू शकेन, जे अस्पष्ट दिसते ते 'असावे' असे वाटते आणि त्याच्या पलीकडले काही दिसतच नाही. तिथे काय काय आहे याची मला कल्पना नाही. त्यामुळे 'आहे' आणि 'नाही' यांच्या दरम्यान 'कदाचित असेल' ते 'बहुधा असावे' यांच्या एक ते नव्व्याण्णऊ टक्के इतक्या शक्यता असतात. "रेकी, फेंगशुई, वास्तूशास्त्र यासारख्या शास्त्रांपासून आपल्याला खूप फायदा झाला" असे सांगणारे लोक आपल्याला भेटतात. हा त्यांचा प्रत्यक्ष आलेला अनुभव असल्यास त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. हे नेमके कशामुळे घडते हे आपल्याला समजायलाच पाहिजे असेही नाही. कारचे हँडल फिरवल्यावर त्यामुळे अख्खी कार कशी फिरते हे किती लोकांना माहीत असते? पण त्यांना कार चालवता येते. क्रोसिनच्या गोळीने ताप कसा उतरतो हे आपणास माहीत नसते, पण तो उतरतो असे दिसते. त्यामुळे ज्यांना जी विद्या अवगत असेल तिचा त्यांनी (चांगल्या कामासाठी) उपयोग करावा हे सांगायची गरज नाही कारण ते लोक तो करतच असतात. पण असे विशेषज्ञ जी भाषा वापरतात ती विज्ञानातल्या परिभाषेपेक्षा वेगळी आहे याची जाणीव ऐकणा-याने ठेवावी. म्हणजे त्याची दिशाभूल होणार नाही. </p> <p>'एनर्जी' या नांवाचे एक शीतपेय आहे, कांही लोक आपल्या मुलांना किंवा दुकानांना 'ऊर्जा', 'तरंग' वगैरे नांवे देतात. त्यांना विज्ञानाच्या परिभाषेतल्या या संकल्पनाचे नियम लागू पडत नाहीत. त्यांचे विश्व वेगळे असते. मात्र 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' यासारख्या विज्ञानाच्या परिभाषेतल्या खास शब्दांचा उपयोग करून झटपट आणि हमखास यश, सुख, संपदा वगैरे सबकुछ देऊ करणा-या कोठल्याही मार्गाकडे डोळसपणे लक्ष देऊन त्यावरून प्रवास केल्यास फसगत होण्याची शक्यता टाळता येईल. <br /></p>]]></description>
<pubDate>Fri, 08 Aug 2008 06:18:49 GMT</pubDate>
</item>

<item>
<title><![CDATA[वर्ष ३ पृष्ठ ७९ डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे]]></title>
<link>http://blog.360.yahoo.com/blog-5cZC9noweaGQh0WnBom7?p=1466</link>
<description><![CDATA[<p>स्व.पु.ल.देशपांडे यांनी वरोरा येथील आनंदवन आश्रमाला भेट देऊन आल्यानंतर त्यावर एक विस्तृत लेख लिहिला होता. तो वाचून मला पहिल्यांदा स्व. बाबा आमटे तिथे करत असलेल्या महान कार्याची सविस्तर माहिती वाचायला मिळाली. त्यानंतर स्व. बाबा आमटे हे नांव त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे कार्य यांवरील आलेले लेख, मुलाखती आणि बातम्या यातून सतत डोळ्यासमोर येत होते आणि त्या नांवाला एक वलय प्राप्त झाले होते. पित्याच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनीसुध्दा समाजसेवेचे व्रत घेतले आहे असे जेंव्हा वाचले तेंव्हा त्यांचे नांव अशा वलयांकित रूपातच समोर आले. </p> <p>तोंपर्यंत स्व.बाबा आमटे यांच्या कार्याचा व्याप खूप वाढला होता. त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम डॉ.प्रकाश करत असतील अशी माझी समजूत पूर्वी होती. नंदनवनाचीच एक शाखा भामरागड परिसरात कदाचित स्थापन केली असावी असे मला वाटले होते. ज्यावेळी त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली तेंव्हा मात्र आश्चर्य आणि आदर या दोन्ही भावनांनी मला भारून टाकले. </p> <p>महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमकलसा या अत्यंत दुर्गम परिसरातल्या गांवात जाऊन डॉ.प्रकाश यांनी आपले कार्य त्या जागी सुरू केले. या भागातील मारिया गोंड या जनजातीतल्या लोकांची अवस्था अतिशय दारुण होती. त्यांचे अनेक प्रकाराने शोषण होत होते. दारिद्र्य आणि उपासमार त्यांच्या पांचवीलाच पूजलेली होती. शालेय शिक्षणाचे नामोनिशान नव्हते. शाळा चालवायला तिथे येण्यासाठी मुले मिळत नव्हती आणि दवाखान्यात येण्यासाठी रुग्ण तयार नव्हते. शहरातून आलेल्या लोकांबद्दलचा त्या आदिवासी लोकांचा अनुभव चांगला नसल्यामुळे त्यांचा शहरी लोकांवर विश्वासच नव्हता. शिक्षणासाठी किंवा उपचारासाठी फी देण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण मोफत मिळत असलेल्या सेवांचा उपयोग करून घ्यायला कोणी धजत नसत.</p> <p>एकीकडे आदिवासी समाजाची अशी वाईट परिस्थिती होती तर दुसरीकडे शहरात मिळत असलेल्या कोणत्याही सर्वसामान्य सुखसोयी त्या भागात उपलब्ध नव्हत्या. वाहतुकीची साधने नसल्यामुळे रोजच्या अन्नाची पंचाईत असे, भाजीपाला तर दृष्टीला पडत नसे. सठी सामासी कोणा कार्यकर्त्याने सायकलवरून दुरून भाजी आणली तर त्या दिवशी दिवाळी मनवायची अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत आपण कोणतीही तक्रार करायची नाही असे डॉ.प्रकाश यांनी ठरवले आणि पडतील तेवढे कष्ट सहन करून त्यांनी आपले खडतर काम चालू ठेवले. </p> <p>डॉक्टर प्रकाश यांनी मारिया गोंड लोकांची बोलीभाषा शिकून आत्मसात केली. आपल्या शहरी पोशाखाला ते लोक घाबरतात हे पाहिल्यावर ते अंगात बनियान आणि अर्धी चड्डी एवढ्याच कपड्यावर राहू लागले. या बाबतीत फक्त पंचा गुंडाळून राहणा-या महात्मा गांधींचा आदर्श त्यांच्यापुढे असणार. त्यांची अत्यंत साधी, सौजन्यपूर्ण वागणूक, मदतीचा हात सतत पुढे करण्याची वृत्ती या सर्वांच्या जोरावर हळूहळू त्यांनी आदिवासी समाजाचा विश्वास संपादन केला. त्यांच्या दवाखान्याची कीर्ती आसमंतात पसरली आणि दूरवरून आजारी माणसे उपचारासाठी त्यांचेकडे येऊ लागली. त्यांच्या शाळेत मुलांची गर्दी होऊ लागली. दुर्गम भागातून 