मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। Reply
मनात आलं तसं लिहीत गेलो आहे. गोड मानून घ्यावे.
'रस्त्यातली गर्दी', 'रस्त्यावरचे घर', ते ताब्यातून गेले तर सामानासकट 'रस्त्यावर येण्याची' भीती अशा शब्दप्रयोगातून 'रस्ता' म्हणजे एक स्थायी अशी जागा असल्याचे ध्वनित होते. एका नाठाळ माणसाला कोणा ति-हाइताने म्हणे विचारले, "कां हो, हा रस्ता कुठे जातो?"
त्याने खंवचटपणाने सांगितले, "मी तरी त्याला कुठे जातांना केंव्हाही पाहिले नाही. कधीपासूनचा हा असा इथेच पडून राहिला आहे."
त्याएवजी त्याला कुठल्याशा गांवाची 'वाट' विचारली असती तर कदाचित वेगळे उत्तर आले असते. 'वाट' ही नेहमीच कुठे तरी जाणारी असते. ती त्या जागेची दिशा दाखवते आणि प्रवासाची निदान सुरुवात तरी करून देते. 'मार्ग' मात्र आपल्याला ईप्सित ठिकाणापर्यंत नेऊन पोचवतो. एकादा माणूस 'वाट चुकून' भरकटत जाऊ शकतो, पण ते लक्षात आल्यावर पुन्हा 'मार्गावर' येतो. माणसेच काय, ग्रहसुध्दा वक्री झाले की मागे जाऊ लागतात आणि ते पुन्हा मार्गी लागले की राशीचक्रातील आपले भ्रमण चालू ठेवतात. कदाचित म्हणूनच शाहीर अनंत फंदी आपल्या फटक्यात "बिकट'वाट' वहिवाट नसावी धोपट'मार्गा' सोडू नको" असा सूज्ञ सल्ला देतात.
कांही माणसे वाममार्गाचा उपयोग करून फायदा मिळवू पाहतात, पण त्या मार्गाने नेण्याला कधीही 'मार्गदर्शन' असे म्हणत नाहीत. 'मार्गदर्शक' किंवा 'पथप्रदर्शक' हा नेहमीच गुरुस्थानी असतो. तो एका उच्च पातळीवरून शिष्याला शिकवण देत असतो. वाटाड्या मात्र सवंगड्यासारखा आपल्याबरोबर असतो आणि तो आपल्यातलाच एक वाटतो. 'मार्ग' या शब्दाला असा महिमा आहे, एक वजन आहे. 'मार्ग' म्हंटल्यावर साधा 'रस्ता' डोळ्यासमोर येत नाही. 'स्वामी विवेकानंद मार्ग' आणि 'लाल बहादुर शास्त्री मार्ग' हे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मुख्य रस्ते आहेत, पण सगळे लोक त्यांचा उल्लेख 'एसव्ही रोड' आणि 'एलबीएस रोड' असाच करतात. "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने परळहून दादर टीटीपर्यंत जावे." अशासारख्या सूचना गणपतीविसर्जनाच्या दिवशी वाचायला मिळतात. कोणाला प्रत्यक्षात तसे बोलतांना मी अजून ऐकले नाही.
'मार्ग' या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. रस्त्यांबरोबरच 'लोहमार्ग', 'जलमार्ग' आणि 'हवाई मार्ग' यांचाही समावेश त्यांत होतो. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी 'ज्ञानयोग', 'कर्मयोग', 'भक्तीयोग' वगैरे विविध मार्ग भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहेत. त्यातला 'भक्तीमार्ग' हा सर्वात सरळ आणि सोपा आहे अशी शिकवण सर्व संतांनी जनतेला दिली आहे.
एकदाचा 'मार्ग' मिळाला की प्रवासी त्यावरून आपल्या पुढील मुक्कामापर्यंत गेलाच असे सर्व साधारणपणे समजले जाते. 'वाटे'मध्ये संकटे आली तर त्यातून गुपचुपपणे निसटायच्या 'पळवाटा' शोधल्या जातात. 'मार्गा'त अडचण आली तर तिचा मुकाबला करून 'मार्ग' मोकळा केला जातो. त्यामुळे एकदाचा मुलगा 'मार्गा'ला लागला की मातापिता त्याच्या भवितव्याबद्दल आश्वस्त होतात. "मार्गस्थ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरितया परत आणीन" असे वचन तू दिले होतेस याची सागराला आठवण करून देत "विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे म्हणुनी मी" असे वीर सावरकर "सागरा, प्राण तळमळला" या सुप्रसिध्द देशभक्तीपर गीतात म्हणतात.
भाग्यवान लोक आपापल्या ध्येयपूर्तीसाठी त्या दिशेने जाणारा राजमार्ग धरतात आणि त्यावर चालत जाऊन प्रगतीची उंच शिखरे गांठतात. कांही दुर्दैवी लोकांना मात्र ते भाग्य लाभत नाही. त्यांची कांही चूक नसतांनासुध्दा त्यांच्या वाट्याला सारखे अपयशच येत राहते. तरीही जीवनाची वाटचाल त्यांना कशीबशी करणे भाग असते. यशस्वी माणसाबरोबर राहणे सर्वांना आवडते, अपयश एकट्यानेच पचवावे लागते. पण थकलाभागला तरी तो न थांबता एक एक पाऊल पुढे टाकत राहतो. हृदयातल्या जखमा लपवून ओठावर स्मितहास्य आणायचा प्रयत्न करतो. अशा दुर्दैवी माणसाच्या मनातल्या करुण भावना स्व. शांता शेळके यांनी किती अप्रतिम रीत्या शब्दबध्द केल्या आहेत ते खालील गीतात दिसते.
हा माझा मार्ग एकला ! शिणलो तरिही चालणे मला ।।
दिसले सुख तो लपले फिरुनी, उरले नशिबी झुरणे दुरुनी, बघता बघता खेळ संपला !
सरले रडणे उरले हसणे, भवती रचितो भलती व्यसने, विझवू बघतो जाळ आतला !
जगतो अजुनी जगणे म्हणुनी, जपतो जखमा हृदयी हसुनी, छळते अजुनी स्वप्न ते मला !
'पथ' हा बिनाजोडाक्षराचा सोपा शब्द असला तरी तो क्वचितच वापरला जातो. दिल्लीला 'राजपथ' व 'जनपथ' हे खूप रुंद रस्ते आहेत. महाराष्ट्रातही कांही गांवातल्या रस्त्यांना 'अमका तमका पथ' असे नांव ठेवलेले असते. फुटपाथला 'पदपथ' असे म्हणतात, नगरपालिका वाहनचालकांचेकडून 'पथक'र वसूल करतात. पण हे सगळे सरकारी कागदोपत्री चालते. बोलण्यात किंवा लिखाणात सहसा कुठे 'पथ' दिसत नाही. संस्कृतमध्ये 'महाजनो येन गतः स पंथः।' असे एक सुभाषित आहे. ज्या वेळी आपल्याला रस्ता माहीत नसेल आणि मार्गदर्शन करायलाही कोणी नसेल तेंव्हा मोठी माणसे ज्या मार्गाने गेले आह्त तोच पंथ धरावा हे इष्ट असते. मराठीत 'पंथ' या शब्दाचा अर्थ 'पथ'हून थोडा वेगळा होतो.
'रस्ता', 'वाट', 'मार्ग' आणि 'पथ' हे एकाच अर्थाचे शब्द असले तरी ते वेगवेगळ्या प्रकाराने उपयोगात आणले जातात. "मी तुझी वाट पाहिली.", " मला तुझा मार्ग दिसला." आणि "मी तुझा रस्ता पाहिला." या वाक्यांचे अर्थ वेगवेगळे होतात. "मी तुझा पथ पाहिला." असे कोणी म्हणतच नाही, कारण 'पथ' हा शब्द बोलीभाषेत येत नाही. हे सगळेच शब्द त्यांच्या वाच्यार्थापेक्षा अलंकारिक अर्थानेच अधिक वेळा आपण वापरतो.
'रस्ता' या शब्दाने त्याच्या प्रत्यक्षातल्या अस्तित्वाचे वर्णन करतात. रस्त्याची लांबी रुंदी किलोमीटर आणि मीटरमध्ये सांगितली जाते. कांही लोक अजून मैल आणि फुटात ती सांगतात. 'रस्ता' कच्चा आहे का पक्का, डांबरी आहे की काँक्रीटचा, सुस्थितीत आहे की पावसाळ्यात तो खड्ड्याने भरला आहे, त्याला चढउतार आहेत की तो सपाट आहे, वगैरे सगळे तपशील 'रस्त्या'चे असतात. मोठ्या 'रस्त्यां'ना फुटपाथ असतात, 'रस्त्यां'च्या कडेला घरे, दुकाने आणि देवळे असतात, कधीकधी तिथे पोचण्यासाठी 'रस्ता क्रॉस करून' पलीकडे जावे लागते. या गोष्टी सांगतांना आपण 'वाट' किंवा 'मार्ग' या शब्दांचा उपयोग सहसा करत नाही.
'वाट' या शब्दाला थोडी ग्रामीण पार्श्वभूमी आहे. तिथले बहुसंख्य लोक शेतावर जातात किंवा राहतात. रानात इकडे तिकडे जाण्यासाठी 'पायवाटा' असतात. रोजच्या जाण्यायेण्यातून 'वहिवाट' पडते. समोरून संकट येतांना दिसले तर 'पळवाटे'ने निसटून जाता येते आणि ते दत्त म्हणून पुढ्यात उभे ठाकलेच तर 'वाट फुटेल' तिकडे पळायचे! आता शहरात राहणा-यांच्या समोर या सगळ्या 'वाटा' प्रत्यक्षात नसतात, पण त्या शब्दांचा उपयोग अलंकारिक अर्थाने होतो. उदाहरणार्थ नियमांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्यातून 'पळवाटा' काढल्या जातात.
'वाट' या शब्दात त्यावरून जाणारे 'वाटसरू' असणार हे गृहीत धरलेले असावे. 'रस्ता' ओस पडू शकतो पण वाट नाही. घरासमोरच्या 'रस्त्या'त पाहण्यासारखे कांही नसते आणि आपण ते पाहण्याचा प्रयत्नही कधी करत नाही. आपले लक्ष त्या वाटेने येणा-या जाणा-यांवर असते. एकाद्या व्यक्तीने येणे आपल्याला अपेक्षित असते, तिच्या येण्यावर आपली पुढली कृती अवलंबून असते किंवा तिने यावे अशी आपली इच्छा असते तेंव्हा ती येईपर्यंत आपण तिची 'वाट पाहतो'. अनेक वेळा ती व्यक्ती येणार नसतेच, फक्त तिचा संदेश येणार असतो. तेंव्हा आपण त्या निरोप्याची 'वाट पाहतो'. अशा वेळी कोणता पोस्टमन तो घेऊन येईल याच्याशी आपल्याला कांही कर्तव्य नसते. आपण त्या पत्राची 'वाट पहात' असतो. आजकाल कोणीही ते प्रत्यक्षात आपल्या हांतात आणून देण्याची गरज उरलेली नाही. तरीही आपण टेलीफोन कॉल, टेक्स्ट मेसेज, ईमेल किंवा स्क्रॅपची 'वाट'च पाहतो. रुळावरून गडगडत येणारी आगगाडी आणि आभाळातून उतरणारे विमान यांचीसुध्दा 'वाट' पाहिली जाते. अनेक वेळा प्रत्यक्षात कोणीही येणारच नसते. एकादा प्रसंग घडणार असतो. तो खास आपल्यासाठीच असतो असेही नाही, तरी आपण त्याची 'वाट' पाहतो. परीक्षेचा निकाल, बढतीची बातमी, दिवाळीचा सण, नववर्ष ही याची उदाहरणे सांगता येतील. थोडक्यात म्हणजे कोणत्याही त-हेची 'प्रतीक्षा करणे' या अर्थाने 'वाट पाहणे' या वाक्प्रचाराचा उपयोग आपण करतो. या जागी 'रस्ता' किंवा 'मार्ग' हे शब्द चालत नाहीत.
'प्रतीक्षा' ही उत्कट भावना साहित्यकृतींमध्ये अनेकवेळा सुंदर शब्दांत रंगवली जाते. एका विरहिणीच्या मनातली व्यथा गीतकार योगेश आपल्या एका लोकप्रिय गीतात अशी व्यक्त करतात,
वाट पाहुनी जीव शिणला, दिसा मागूनी दिसं टळला ।
सुर्व्या आला, तळपून गेला, मावळतीचा खळीगाल आला ।।
या कवितेतली ग्रामीण भागातली विरहिणी दिवसभर कामाच्या रगाड्यात दमून रात्री तरी निवांत झोपत असेल, पण कवी आ. रा. देशपांडे ’अनिल’ यांनी ज्या विरहिणीचे मनोगत सांगितले आहे, तिची अवस्था जास्तच गंभीर आहे. रात्रीसुध्दा तिच्या डोळ्याला डोळा लागत नसल्याने तिचे डोळे शिणून गेले आहेत.
थकले रे डोळे माझे, वाट तुझी पाहता ।
वाट तुझी पाहता रे, रात्रंदिन जागता ।।
"जीवन हाच एक प्रवास आहे." अशी कल्पना करून नेहमीच त्या अनुषंगाने त्याची हकीकत सांगितली जाते. आपले बालपण, यौवन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय या सगळ्यातून आपली 'वाटचाल' चाललेली असते. कधी कधी आपली 'वाट चुकते' आणि ते लक्षात आल्यावर आपण पस्तावतो. या वाटेवर चालतांना आपल्याला कोणाकोणाची सोबत मिळते. ती नसेल तरीही "एकला चॉलो, एकला चॉलो, एकला चॉलोरे" असे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर सांगतात. एक उर्दू शायर म्हणतो,
"मैं अकेलाही चला था .. मंजिलतरफ, लोग आतेही रहे, कारवाँ बनता गया।"
या वाटेवर आपल्याला अनेक प्रकारची दृष्ये दिसतात, बरेवाईट अनुभव येतात. ते आपण सकारात्मक अर्थाने घ्यायचे की नकारात्मक हे ज्याने त्याने ठरवायचे असते. कवी आ. रा. देशपांडे ’अनिल’ अशा एका कलंदर माणसाचे आगळे विचार या शब्दात सांगतात.
वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुलाफुलात चाललो ।
मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी, आपुलीच साथ कधी करित चाललो ।।
आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद, नादातच शीळ वाजवीत चाललो ।।
चुकली तालात चाल, लागला जिवास बोल, ढळलेला तोल सावरीत चाललो ।।
खांद्यावर बाळगिले, ओझे सुखदुःखाचे, फेकुन देऊन अता परत चाललो ।।
अन्नाच्या शोधात रानावनात भटकणारा आदिमानव शेती करून आणि घर बांधून एका जागी रहायला लागला त्या काळापासून जवळच्या ठिकाणी चालत जाण्यासाठी त्याने पाउलवाटा तयार केल्या. चाकांचा उपयोग लक्षात आल्यावर माणसाने चाके लावलेली गाडी तयार केली आणि तिला ओढण्यासाठी पाळीव जनावरांना जुंपले. पाऊल उचलून टाकतांना आपण मधले अडथळे किंवा खड्डे ओलांडू शकतो, पण चाकांना फिरत फिरत पुढे जाण्यासाठी खाली सलग असा जमीनीचा पृष्ठभाग लागतो. माणसांना बसण्यासाठी किंवा सामान ठेवण्यासाठी गाडीचा उपयोग करायचा असेल तर तिचे आकारमान ब-यापैकी असायला हवे आणि त्यासाठी तिला पुरेशी लांबी रुंदी द्यायला हवी. त्यांच्यामुळे गाडीला वळण्यासाठी जास्त जागा लागते. या सगळ्या अडचणींमुळे अरुंद आणि वळणावळणाच्या पायवाटा गाडी ओढत नेण्यासाठी अपु-या पडतात. थोडी मोकळी जागा पाहून, तिथले मोठे दगडधोंडे बाजूला करून आणि खड्डे बुडवून गाड्या नेण्यासाठी कच्चे रस्ते तयार केले गेले. चालणा-या माणसांच्या पावलाखाली पायवाटा आपल्या आप निसर्गतःच तयार होतात. त्या मुद्दाम बनवाव्या लागत नाहीत. गाडीचे रस्ते मात्र मानवी प्रयत्नाने बनतात. ज्याला त्याची सर्वात आधी गरज पडेल तो सुरुवात करतो. इतर लोकांनी त्याचा उपयोग करून घेता घेता त्यात सुधारणा होत जाते. अशा रीतीने ते बनत जातात. मातीवर जशी माणसाची पावले उमटतात तसेच गाडीच्या चाकांच्या रेघांचे पट्टे दिसतात. गाडीचा भार माणसापेक्षा अनेकपट जास्त असल्यामुळे या चाको-या पाऊलखुणांपेक्षा खोल बनतात. मागाहून त्या मार्गाने जाणा-या गाड्यांची चाके त्या चाको-यांना अधिकाधिक ठळक बनवत जातात आणि त्यामागून आलेल्या गाड्यांची चाके आपोआपच त्यातून जातात. यावरूनच ठराविक पध्दतीने रुळलेल्या जीवनशैलीला चाकोरी म्हणायची पध्दत पडली.
माणसांनी एकत्र राहायला लागून खेडी आणि नगरे वसवली तेंव्हा घरांसोबतच त्यांना जोडणारे रस्तेही बांधले. तसेच एका गांवातून दुस-या गांवी जाण्यासाठी त्यांना जोडणा-या वाटा तयार केल्या. जिथे भौगोलिक परिस्थिती अनुकूल होती आणि माणसांची ये जा चांगली होती अशा ठिकाणी गाडी जाण्याइतपत रुंद रस्ते बनले. दुर्गम डोंगराळ भागात ते तयार करणे कठीण असल्यामुळे पायवाटाच राहिल्या. गांवातसुध्दा कांही ठिकाणी प्रशस्त रस्ते तर कुठे अरुंद असे बोळ बनले. सामान्य माणसे बैलगाड्यांचा उपयोग करीत असत, पण राजघराण्यातले लोक सजवलेल्या प्रशस्त रथात बसून फिरत. त्यासाठी तसे चांगले रुंद रस्ते हवेत. राज्याचे संरक्षण आणि विस्तार करण्यासाठी पायदळ, अश्वदल, गजदल वगैरेंची सेना इकडून तिकडे जलद गतीने नेण्यासाठी चांगले रस्ते हवेत. त्यामुळे इतिहासकाळातल्या बहुतेक राजांनी स्वतः, राज्यकारभार आणि प्रजा या सर्वांच्या उपयोगासाठी आपल्या राज्यात रस्ते बांधवून घेतले. अशा त-हेने वेगवेगळ्या कारणांसाठी रस्ते तयार होतच गेले.
" अमक्या तमक्या सम्राटाने किंवा सुलतानाने कोणती लोकोपयोगी कामे केली?" असा एक प्रश्न आम्हाला इतिहासाच्या पेपरात बहुतेक वेळा यायचा आणि त्यावर "त्याने नद्यांवर घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, रस्ते बांधले, रस्त्यांच्या कडेला झाडे लावली. " हे ठराविक उत्तर दिले की मार्क मिळत असत. हे न करणारा कोणी सम्राट किंवा सुलतान इतिहासात कधी झालाच नसणार आणि असलाच तर त्याच्या नांवाने हा प्रश्न विचारला जात नसणार! कांही मुले तर " त्याने रस्त्यांच्या मध्ये दिव्याचे खांब उभे केले." असे देखील उत्साहाच्या भरात लिहून जात !
राजा किंवा प्रजा यातल्या कोणीही रस्ते बांधले तरी त्यासाठी दगड, माती, वाळू हीच सामुग्री उपलब्ध असायची आणि पहार, कुदळ, फावडे, धुम्मस अशा अवजारांचा उपयोग करून माणसांच्या शक्तीनेच ते काम होत असे. यामुळे जिथे सपाट आणि मऊ जमीन असेल त्या भागात रस्ते बांधणे सोपे असे. तेवढ्यासाठी डोंगर फोडता येत नसे. बारमाही पाण्याचा प्रवाह असलेल्या मोठया नद्या नौकेमधूनच ओलांडाव्या लागत. त्यांवर रस्त्यासाठी पक्का पूल बांधणे जवळ जवळ अशक्य होते.
जुन्या काळी बांधल्या गेलेल्या देवळांकडे जाणा-या आणि विशेषतः त्यांना प्रदक्षिणा घालण्यासाठी तयार केलेल्या वाटांवर अनेक जागी फरशा बसवलेल्या दिसतात. या ठिकाणी भाविकांची रहदारी जास्त असते म्हणून त्यांची सोय करण्यासाठी कोणी उदार अंतःकरणाचा दानशूर भक्त ते काम करून जात असेल. कदाचित मंदिरात जमा झालेल्या दक्षिणेचा कांही भाग भक्तांच्या सोयीसाठी त्यावर खर्च होत असेल किंवा त्यामुळे अधिकाधिक भक्त यावेत आणि त्यांनी अधिक दान करावे यासाठी ही गुंतवणूक केली जात असेल. अशा प्रकारे हा त्या संस्थेच्या आस्थापनाच्या अर्थकारणाचा भाग असेल. कांही लोक त्या फरशांवर आपली नांवे खोदून ठेवीत. संतमहंतांच्या पावलांचा स्पर्श होऊन आपण पावन व्हावे ही भावना त्यात असेल. युरोपमधील म्हणजे आजकालच्या आधुनिक जगातील कांही शहरात बाजारातले कांही रस्ते खास पादचा-यांसाठी राखून ठेवलेले असतात. त्या रस्त्यांवरसुध्दा फरशा बसवलेल्या पाहिल्यावर मला आमच्या गांवातल्या पुरातन मंदिराची आठवण झाली.
एका गांवाहून दुस-या गांवापर्यंत जाणा-या रस्त्यांवर अशा फरशा बसवणे व्यवहार्य नसणार, कदाचित त्या चोरीला जायचीच शक्यता जास्त असेल, शिवाय बैलगाडी किंवा टांग्यासाठी त्या त्रासदायकच ठरणार. यामुळे मुख्य रस्ते मातीचेच राहिले. पूर्वीच्या काळात त्यावरील रहदारीसुध्दा अगदी कमी प्रमाणात असे. एकतर लोकसंख्याच कमी होती. त्यातले सर्वसामान्य लोक आपल्या पंचक्रोशीच्या बाहेर फारसे जातच नसत. सैनिक, व्यापारी आणि यात्रेकरू तेवढेच नेहमी परगांवी जात असत. त्याखेरीज अवर्षण, महापूर, परचक्र यासारख्या आपत्तींमध्ये इतर लोकांना वाट फुटेल तिकडे पळावे लागत असे. त्या वेळी रस्त्याची पर्वा कोण करेल? त्यामुळे मातीच्या रस्ते त्यावरील नेहमीच्या रहदारीसाठी पुरे पडत.
ग्रामीण भागात ही परिस्थिती भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत होती. माझ्या लहानपणी आमच्या गांवातले एकूण एक रस्ते मातीचे होते. मी शाळेत शिकत असतांना त्यांच्या डांबरीकरणाची प्रक्रिया आधी गांवाबाहेर सुरू झाली. नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर पीडब्ल्यूडीने हे काम ज्या वेळी सुरू केले तेंव्हा ते पाहण्यासाठी गांवकरी मुद्दाम वेशीबाहेर फिरत जात. रस्त्याचा थोडा थोडा भाग खोदणे, त्यावर मुरुमाचे थर पसरवून ते रोडरोलरखाली चेपणे, त्यावर वाळू पसरून आणि वितळलेले डांबर ओतून पुन्हा रोडरोलरने त्यावर इस्त्री करणे वगैरे प्रकार आम्ही डोळे विस्फारून पहात असू आणि तयार झालेल्या गुळगुळीत रस्त्याचे कौतुक एकमेकांपाशी करत असू.
ही सुधारणा आमच्या गांवापर्यंत उशीराने आली असली तरी तिचा प्रारंभ सुधारलेल्या जगात कधीच झाला होता. यंत्रयुगात मोटारींचा वापर सुरू होताच गाड्यांचा वेग आणि त्यांची वहनक्षमता यांत प्रचंड फरक पडला आणि दळणवळणाच्या बाबतीत आमूलाग्र बदल झाला. पण मोटारगाड्यांसाठी चांगले रस्ते असणे जरूरीचे झाले. त्याबरोबर आस्फाल्ट आणि सिमेंट काँक्रीटसारखी नवी द्रव्ये निघाली आणि रस्ते बनवण्याच्या कामात यंत्रांचा उपयोग सुरू झाल्याने ते सुकर झाले. डोंगर फोडून त्यातून बोगदे करणे आणि डोंगराला उभ्या आडव्या खांचा करून त्यातून सपाट रस्ते तयार करणे शक्य झाले. मोठमोठ्या नद्यावरसुध्दा पूल बांधता आले. त्यामुळे नदीच्या पात्रांमुळे विभागले गेलेले भाग जोडले गेले. अर्थातच रस्ते सुधारल्यावर आणि नवे रस्ते उपलब्ध झाल्यावर वाहतूक वाढत गेली. अशा प्रकारे रस्ते आणि वाहने या दोन्हींमध्ये कल्पनातीत अशी वाढ झाली आणि अजून होतेच आहे.
लवकरच देशभर रस्त्यांचे जाळे विणले गेले. समोर दिसणारा रस्ता आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाईल किंवा कुठल्या गांवचा रहिवासी त्यावरून आपल्यापर्यंत येऊन पोचेल याला मर्यादा राहिली नाही. त्यातून कुणाकुणाच्या कुणाकुणाबरोबर गांठीभेटी होतील त्याचा नेम नाही. अजून जिला आपला प्रियकर भेटलेला नाही अशा एक स्वप्नाळू युवतीचे मनोगत सांगतांना श्रीमती शांताबाई शेळके लिहितात,
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा ।
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?
स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे ।
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे ।
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा ।।
समजा आपण एकाद्या माळरानात उभे आहोत. आता कृपया " तिथं कशाला तडफडायला गेलो आहोत?" असे विचारून नसते फाटे फोडू नका. तर आपल्या समोर उंचसखल अशी जमीन आहे. त्यात कुठे भुसभुशीत माती आहे तर कुठे वेडेवाकडे खडक आहेत, मध्ये मध्ये कांटेरी झुडुपे उगवली आहेत, अधून मधून एकादे वडाचे नाही तर कडुलिंबाचे मोठे झाड आहे, कुठे नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरीमुळे पाण्याची डबकी साठली आहेत, कुठे चिखल झाला आहे आणि त्या सगळ्याच्या पलीकडे दूर अंतरावर पण नजरेच्या टप्प्यात एका मंदिराचे सुंदर शिखर दिसते आहे. आपल्याला तिथे जायचेच आहे, पण तिकडे जाणारी पक्की सडक कांही कुठे दिसत नाही. अशा वेळी आपण काय करू?
जिथे उभे असू तिथून शिखराकडे नजर ठेऊन सरळ रेषेत चालत गेलो तर ते कमीत कमी अंतर असेल. त्यामुळे चालण्याचे कष्ट आणि त्यासाठी लागणारा वेळ दोन्ही किमान राहतील. एकाद्या मोकळ्या मैदानात आपण ते करू शकतो, पण या माळरानात अनेक अडथळे आहेत. आपण कुठल्याही झाडाच्या बुंध्याला मस्तवाल हत्तीसारखी धडक देऊ शकत नाही की कांट्याकुट्याच्या झुडुपात रानडुकरासारखे शिरू शकत नाही. उंच खडकावर चढू शकत नाही की तुटलेल्या खडकावरून खाली उडी मारू शकत नाही. पाण्याच्या डबक्यात शिरून आपले कपडे मळवायचे नसतात आणि चिखलात घसरून पडण्याचा धोका पत्करायचा नसतो. या सगळ्या अ़डचणी एक एक करून बाजूला सारायच्या झाल्या तर त्यासाठी केवढे श्रम लागतील आणि केवढा वेळ लागेल? म्हणजे देवदर्शन बाजूलाच राहून जाईल. त्यामुळे तसले कांही करायचा विचार आपण करत नाही. फार फार तर एकाद्या धोंड्याला अडखळून ठेच लागली तर रागाने तो उचलून फेकून देऊ किंवा जाता जाता डोळ्यावर येणारी एकादी झाडाची फांदी तोडून टाकू एवढेच करू. पायी चालतांना आपण प्रत्येक पाऊल ठेवण्यापूर्वी थोडेसे वळू शकतो, पुढचे पाऊल थोडे उंचावर किंवा खोलात, जवळ किंवा लांब टाकू शकतो आणि लहानसा अडथळा किंवा खड्डा ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. यापेक्षा मोठ्या अडथळ्यांना वळसा घालत नागमोडी मार्गाने पुढे जाऊन आपण त्या देवळापर्यंत पोचून जाऊ. जीवनातही असेच असते. आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी लहानसहान अडथळे ओलांडून आणि मोठ्या अडचणींपासून सुरक्षित अंतर राखून वळसे घेत पुढे जावे लागते.
आपण जसजसे चालत पुढे जातो तेंव्हा आपली पावले कांही खुणा मागे ठेवत जातात. ओली किंवा भुसभुशीत जमीन किंवा वाळू असेल तर त्यावर आपली पावले उमटतात, गवतातून गेतो तर पायाखाली आलेली गवताची पाती मातीत दबली जातात, कठीण खडकावर मात्र कांही परिणाम झाल्यासारखे दिसत नाही. ऊन, वारा, पाऊस, लाटा यामुळे पावलांच्या खुणा पुसून जातात, गवताची नवी पाती उगवतात आणि तरारून पुन्हा उभी राहतात. त्यानंतर त्या पाउलखुणांचा मागमूसदेखील रहात नाही. पण त्यापूर्वीच पूर्वीच्या पाउलखुणा शोधत आपण त्याच मार्गाने पुन्हा पुन्हा चालत गेलो किंवा आपल्या मागून बरेच लोक त्या वाटेने चालत गेले तर प्रत्येक पावलागणिक झालेल्या खुणा वेगळ्या रहात नाहीत. त्या एकमेकात मिसळून त्यातून एक पाउलवाट दिसू लागते. जोंवर ही पायवाट उपयोगात येत असते तोंपर्यंत ती वेगळी दिसते आणि बहुतेक लोक त्या वाटेवरूनच जातात. त्यामुळे ती अधिकाधिक गडद होत जाते. पण पावसाळ्यात त्या पायवाटेवरची रहदारी बंद झाली तर पावसाळा संपल्यावर ती वाट दिसतसुध्दा नाही. त्यानंतर कांही लोक नव्या पायवाटा तयार करतात आणि इतरेजन त्यावरून जाऊ लागतात.
रानावनात राहणारे लोक नेहमी अशा पाउलवाटांचाच उपयोग करतात. शेतक-यांना आपल्या घरातून शेतावर जाण्यासाठी आणि शेतातल्या पिकामधून एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी अशा कच्च्या वाटाच असतात. इतकेच नव्हे तर मोठ्या शहरांतल्या अनेक वसाहतींमध्ये इमारतींच्या मधून जाणारे शॉर्टकट सर्रास दिसतात. या वाटांवर पहिले पाऊल कोणी ठेवले ते कोणाला ठाऊकसुध्दा नसते. पण एकाला पाहून दुसरा असे करत त्या वाटेने लोक जा ये करू लागतात.
खूप घनदाट रान माजले असेल तर कधी कधी एका जागी सुरू झालेली पायवाट वळणे घेत कुठपर्यंत जाणार आहे याचा अंदाज लागत नाही. त्यामुळे आपण योग्य त्या मार्गाने जात आहोत की नाही अशी शंका यायला लागते. त्याची खात्री करून घेण्यासाठी वाटेतल्या कांही खाणाखुणा लक्षात ठेवायच्या असतात. अशाच एका निर्जन जागी राहणा-या आपल्या प्रियेच्या घराचा पत्ता सांगतांना कवी म्हणतात,
गवत उंच दाट दाट, वळत जाई पायवाट ।
वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे ।
त्या तिथे पलीकडे तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे ।।
हल्ली नेहमीच कोठे ना कोठे सौंदर्यस्पर्धा (खरे तर स्त्रीसौंदर्यस्पर्धा) होत असतात. त्यातून विजेत्या महिलांना नगरसुंदरीपासून विश्वसुंदरीपर्यंतचे बहुमान दिले जातात. त्या सौंदर्यवतींची छायाचित्रे आपण वर्तमानपत्रात पाहतो आणि विसरून जातो. ऐश्वर्या रायसारखी एकादीच दीर्घकाळपर्यंत प्रसिध्दीच्या झोतात असते, त्यामुळे तिचा चेहेरा लक्षात राहतो. इतर सिनेतारकासुध्दा त्यांना मिळालेल्या प्रसिध्दीनुसार कमीअधिक काळ डोळ्यासमोर असतात. त्यातले कांही चेहेरे कायम स्मरणात राहतात. असाच एक असामान्य सुंदर चेहेरा सुमारे साठ वर्षांपूर्वी जगासमोर आला आणि दहाबारा वर्षे सिनेजगतावर राज्य करून अस्तंगत झाला आणि अकाली काळाच्या पडद्याआड गेला. त्यालाही जवळजवळ चाळीस वर्षे होऊन गेली. तरीही तिच्या मृत्यूनंतर जन्माला आलेली आजची रसिकांची पिढी "तुझे देखके ऐ मधुबाला, मेरा दिल ये पागल झाला" असे म्हणत नाचते आहे. 'भारतीय सिनेसृष्टीमधील सर्वात सुंदर चेहेरा' हा तिला मिळालेला खिताब आजपर्यंत कोणी काढून घेऊ शकलेली नाही. कोणीतरी तिला ' भारतीय मेरिलिन मनरो' असे म्हणताच तिच्या एका चाहत्याने "यापेक्षा मेरिलिन मनरोला हॉलिवूडची मधुबाला" असे म्हणायला पाहिजे असे सुचवले.
मधुबालाचा जन्म दिल्लीच्या एका पठाण कुटुंबात झाला. तिचे नांव मुमताज असे ठेवले होते. तिला मिळालेले सौंदर्याचे वरदान घरची बिकट आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी कामाला येईल असा विचार करून तिच्या वडिलांनी मुंबई गाठली आणि प्रयत्न करून मुमताजला बाल कलाकार बनवले. बेबी मुमताज या नांवाने तिने अनेक सिनेमात काम करून अर्थार्जन केले. त्या काळातल्या परिस्थितीत बाल कलाकारांना तसा मर्यादितच वाव असायचा. पण वयाची चौदा वर्षाची झाल्यावर तिने केदार शर्मा यांच्या नीलकमल या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत पदार्पण केले तेसुध्दा राजकपूर बरोबर! याच वेळी तिला पडद्यावर मधुबाला हे नांव देण्यात आले ते पुढे सर्व रसिकांच्या तोंडी झाले. त्यानंतर दोन वर्षांनी आलेला महल हा सिनेमा सुपरहिट झाला आणि मधुबाला तसेच लता मंगेशकर या दोघी या चित्रपटानंतर सुपरस्टार झाल्या. त्यातले आयेगा, आयेगा, आयेगा आनेवाला हे रहस्यमय गाणे आजसुध्दा अनेकांच्या टॉप टेनमध्ये आहे.
अनुपम सौंदर्याच्या सोबतीला मधुबालाकडे अभिनयकौशल्य होते, तसेच चांगले काम करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी वगैरे अनेक गुण होते. घरच्या परिस्थितीमुळे तिला शालेय शिक्षण मिळाले नाही, पण तिने हिंदी उर्दूमध्ये तर प्राविण्य मिळवलेच, शिवाय 'गाँवकी गोरी' प्रकारचा रोल करत असतांना सहकलाकाराकडून ती फावल्या वेळात इंग्रजी शिकत असे. या वृत्तीमुळेच ती खेड्यातल्या गरीब अडाणी मुलीपासून ते शहरातल्या श्रीमंत किंवा मॉडर्न मेमसाहिबापर्यंत कुठलाही रोल सहजपणे करत असे.
तिने राजकपूरबरोबर काम करून सुरुवात केली आणि अशोककुमार, दिलीपकुमार, देवआनंद, भारतभूषण, प्रेमनाथ, प्रदीपकुमार,गुरुदत्त, सुनीलदत्त इत्यादीं तिच्या काळातील सर्व आघाडीच्या नायकांसोबत काम केले. त्यातल्या कांहींबरोबर तिचे नांव जोडले गेले, कांहींनी तिच्यावर एकतर्फी प्रेम केले, एकाशी तिचे सूत जमले होते वगैरे बातम्या त्या काळातल्या फिल्मी गॉसिपमध्ये चवीने वाचल्या जात असत. अखेरीस किशोरकुमारबरोबर तिचे लग्न झाले तोपर्यंत ती हृद्रोगाने व्याधीग्रस्त झाली होती.
मधुबाला ज्या काळात सिनेमा गाजवत होती तो काळ सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा होता. त्यामुळे अनिल बिस्वास, नौशाद, शंकर जयकिशन, मदनमोहन, ओ.पी.नैयर आदि सर्व आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांनी दिलेल्या मधुर चालींनी नटलेली गाणी तिने पडद्यावर गायिली आणि ती गाणी अजरामर झाली आहेत. अशाच निवडक गाण्यांचा खजिना अशोक हांडे यांनी आपल्या मधुरबाला या आपल्या नव्या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांपुढे आणला आहे. स्वतः श्री अशोक हांडे यांचे निवेदन, मधुबालाच्या जुन्या दुर्मिळ चित्रपटातली निवडक दृष्ये आणि नव्या पिढीतल्या वादकांच्या ताफ्याबरोबर नव्या दमाच्या गायकगायिकांच्या आवाजात मधुबालाने पडद्यावर म्हंटलेली गाणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. सादरीकरणाच्या बाबतीत हांडे तरबेज आहेतच. त्यांचे निवेदन, पडद्यावरील दृष्ये आणि लाइव्ह म्यूजिक हे तीन्ही इतके सफाईने एकमेकात मिसळले जातात की क्षणभराचाही खंड त्यात पडत नाही.
विस्मृतीच्या आड गेलेल्या जुन्या सिनेमांची थोडीशी झलक दाखवल्यानंतर महल मधले आयेगा आनेवाला हे जबरदस्त गाणे येते आणि प्रेक्षक सांवरून बसतात. त्यानंतर मिस्टर अँड मिसेस फिफ्टीफाय, गेटवे ऑफ इंडिया, काला पानी, हावडा ब्रिज, बरसातकी रात, हाफ टिकट वगैरे सिनेमातली एकाहून एक गोड गाणी येत राहतात. मुगले आजम आणि चलतीकी नाम गाडी हे दोन चित्रपट मधुबालाच्या आयुष्यात खास महत्वाचे आहेत. हे दोन्ही चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासात आपापल्या जागी लँडमार्क ठरले आहेतच. मुगले आजम या भव्य चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस दिलिपकुमार आणि मधुबाला यांचे व्यक्तिगत संबंध पराकोटीचे बिघडलेले होते हे त्यातली प्रणयदृष्ये पाहतांना कोणाला खरे वाटणार नाही. चलतीका नाम गाडी बरोबर मधुबाला आणि किशोरकुमार यांच्या प्रेमसंबंधाची गाडी चालू लागली आणि त्याची परिणती अखेर त्यांच्या विवाहात झाली. या दोन्ही सिनेमातली गाणी या कार्यक्रमात अप्रतिम बसवली आहेत आणि प्रेक्षकांनीही वन्समोअरची मागणी करून त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.
हा कार्यक्रम पाहतांना जुन्या आठवणींना उजळा मिळाला असे नेमके मला म्हणता येणार नाही कारण रेंगाळलेला मुगले आझम सोडून मधुबालाचा कोणताच चित्रपट माझ्या आठवणीत रिलीज झाला नाही. मधुबालाच्या बहराच्या काळात मी अजून सिनेमे पहायला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे कधीकाळी मी तिचा फॅन असण्याचा संभव नव्हता. तिचा अभिनय असलेले बहुतेक चित्रपट मी मॅटिनीमध्येच पाहिले आहेत, तेंव्हाच ते खूप जुने झालेले होते. त्यानंतर ते टीव्हीवर अधून मधून पहायला मिळतात. पण इतक्या जुन्या काळात अस्तित्वात असलेल्या टेक्निकमधून केलेल्या कृष्णधवल छायाचित्रणातूनसुध्दा तिचे जे सौंदर्य दिसते ते लाजवाबच म्हणावे लागेल.